Bankipur Datia Exit Poll: बिहारमधील बांकीपूर आणि मध्य प्रदेशमधील दतिया विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 30 जुलै 2026 रोजी पार पडली. बांकीपूरमध्ये 34.30% तर दतियामध्ये 71.44% मतदान झाले असून 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. बांकीपूर मतदारसंघाचे आमदार नितीन नवीन हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता.
तर दतिया मध्ये काँग्रेसचे आमदार राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द झाल्याने या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक झाली. ‘रुद्र रिसर्च अँड अॅनालिटिक्स, पुणे’ संस्थेने बांकीपूर आणि दतिया मतदारसंघात प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन मतदारांचा कल, स्थानिक राजकीय परिस्थिती, विविध पक्षांची रणनीती तसेच सामाजिक समीकरणांचा अभ्यास करून हा एक्झिट पोल तयार केला आहे.
यानुसार बांकीपूरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेले जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होत असून दतियामध्ये काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह हे विजय होण्याची शक्यता आहे.
बांकीपूर विधानसभा पोटनिवडणूक: रुद्र रिसर्च एग्झिट पोल
बांकीपूरमध्ये एकूण 3,79,295 मतदार आहेत. या निवडणुकीत 130098 (34.30%) मतदारांनी मतदान केले. या पोटनिवडणुकीत भाजपकडून नीरज कुमार सिन्हा, जन सुराज पक्षाकडून प्रशांत किशोर आणि राजदकडून रेखा कुमारी गुप्ता यांच्यासोबत एकूण 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
नोट:- बांकीपूरचा एक्झिट पोल 2,500 मतदारांच्या फेस-टू-फेस सर्वेक्षणावर आधारित असून उमेदवारांच्या मतांच्या टक्केवारीच्या अंदाजामध्ये ±5% पर्यंत त्रुटीची मर्यादा शक्य आहे.
‘रुद्र रिसर्च’च्या एक्झिट पोलनुसार जन सुराज पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर यांना 65049 (50%), भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांना 46835 (36%), राजदच्या उमेदवार रेखा कुमारी गुप्ता यांना 13010 (10%) तर इतर उमेदवारांना 5204 (4%) मते मिळण्याची शक्यता आहे. जन सुराज पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर हे 18214 (14%) मतांच्या फरकाने स्पष्ट आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
जन सुराजला आघाडी मिळण्याचे प्रमुख मुद्दे
‘रुद्र रिसर्च’च्या अंदाजानुसार जन सुराजच्या बाजूने प्रशांत किशोर यांची सुशिक्षित नेता अशी प्रतिमा, प्रभावी वक्तृत्व, स्थानिक प्रश्नांवरील प्रचार, राजद स्पर्धेबाहेर गेल्याची धारणा, भाजप-जन सुराज यांच्यातील थेट लढत, तेजस्वी यादव यांच्या प्रचाराला झालेला उशीर, महागठबंधनच्या पारंपरिक व भाजपाच्या फॉरवर्ड मतदारांचा पाठिंबा, जन सुराजची जातीपलीकडील प्रतिमा, सुशिक्षित व युवा मतदारांचा कल, पेपर लीक आंदोलनाचा प्रभाव, सुनियोजित प्रचार, जन सुराज संघर्ष वाहिनीचे कार्य, सोशल मीडियावरील सक्रियता तसेच भाजपविरोधातील काही प्रमाणातील सत्ताविरोधी भावना, बेरोजगारी, पूरस्थिती इतर स्थानिक समस्यांमुळे जन सुराजला अधिक पाठिंबा मिळताना दिसत आहे.
याशिवाय, नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्याची धारणा आणि मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावरील आरोपांमुळे कुर्मी व कुशवाह मतदारांचा जन सुराजकडे कल वाढल्याने प्रशांत किशोर यांना स्पष्ट आघाडी मिळताना दिसून येते.
भाजपसाठी सकारात्मक राहिलेल्या बाबी
‘रुद्र रिसर्च’च्या अंदाजानुसार भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांच्या बाजूने 40 स्टार प्रचारकांचा प्रचार, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा प्रभाव, नितीन नवीन व मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचे रोड शो, प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांची सक्रियता, वॉर्ड-टू-वॉर्ड प्रचार, भाजपचा पारंपरिक मतदारवर्ग, कायस्थ, राजपूत, वैश्य, SC-पासवान व इतर समाजांचा पाठिंबा, ज्येष्ठ व महिला मतदारांचा कल, भाजपची मजबूत संघटनात्मक ताकद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता हे भाजपसाठी सकारात्मक मुद्दे ठरले.
बांकीपूर पोटनिवडणुकीतील प्रमुख मुद्दे:
पेपर लीक व विद्यार्थी आंदोलन, बेरोजगारी, वाहतूक कोंडी, पाणी साचणे व ड्रेनेज, विकासकामे, बदलाचे राजकारण, जातीय समीकरणे, उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, जन सुराजकडून भाजप व मुख्यमंत्री यांच्यावरील आरोप तसेच नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा हे प्रमुख निवडणूक विषय ठरले.
दतिया विधानसभा पोटनिवडणूक: रुद्र रिसर्च एग्झिट पोल
दतिया मतदारसंघात एकूण 2,19,844 मतदार असून पोटनिवडणुकीत 1,57,056 मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत एकूण 21 उमेदवार रिंगणात होते. मुख्य लढत मात्र भाजपचे आशुतोष तिवारी आणि काँग्रेसचे घनश्याम सिंह यांच्यात असल्याचे दिसून आले. आझाद समाज पार्टी-कांशीरामचे दामोदर सिंह यादव हेही या लढतीतील महत्त्वाचे उमेदवार मानले जात आहेत.
नोट:- दतिया एक्झिट पोल 2,425 मतदारांच्या फेस-टू-फेस सर्वेक्षणावर आधारित असून उमेदवारांच्या मतांच्या टक्केवारीच्या अंदाजामध्ये ±5% पर्यंत त्रुटीची मर्यादा शक्य आहे.
‘रुद्र रिसर्च’च्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसचे घनश्याम सिंह यांना 69105 (44%), भाजपचे आशुतोष तिवारी यांना 61252 (39%), आझाद समाज पार्टीचे दामोदर सिंह यादव यांना 23558 (15%) तर इतर उमेदवारांना 3141 (2%) मते मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांचा 7853 (5%) फरकाने विजय होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसला आघाडी मिळण्याचे प्रमुख मुद्दे
काँग्रेसने दतिया राजघराण्याशी संबंधित व दोन वेळा आमदार राहिलेले अनुभवी नेते कुंवर घनश्याम सिंह यांना उमेदवारी दिली. त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि राजकीय अनुभव काँग्रेससाठी जमेची बाजू ठरल्याचे दिसते. दतिया हा माजी गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांचा बालेकिल्ला मानला जातो.
मात्र, त्यांना उमेदवारी न देता आशुतोष तिवारी यांना संधी दिल्याने काही समर्थकांतील नाराजीचा काँग्रेसला फायदा झाल्याचे दिसून आले. भाजपचे काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानेही पक्षाला बळ मिळाले. ग्रामीण भागातील भाजपचा तुलनेने कमी प्रभाव, प्रचारातील समन्वयाचा अभाव, तरुण व शेतकरी वर्गातील नाराजी, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, खतटंचाई, वीजपुरवठ्यातील अनियमितता आणि सत्ताविरोधी वातावरण यांचा काँग्रेसला लाभ झाल्याचे सर्वेक्षणात आढळले.
काँग्रेसकडून जीतू पटवारी, उमंग सिंघार, दिग्विजय सिंह व जयवर्धन सिंह हे प्रचारात सक्रीय दिसून आले. यामुळे काँग्रेसचा या ममतदारसंघातून आघाडीवर असल्याचे दिसून येते.
भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी केलेला प्रचार
भाजपकडून मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, प्रदेशाध्यक्ष हेमंत खंडेलवाल, माजी मंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा, खासदार भारतसिंह कुशवाह यांच्यासह प्रमुख नेत्यांनी जोरदार प्रचार केल्याने निवडणूक प्रतिष्ठेची ठरली.
जातीय समीकरण कल
ठाकूर, कुशवाह आणि अनुसूचित जाती (एससी) समाजातील मतदारांचा कल काँग्रेसकडे, तर ब्राह्मण आणि यादव समाजाचा कल भाजपकडे, अहिरवार समाजातील मतदार आझाद समाज पार्टीच्या बाजूने असल्याचे दिसून आले, तर इतर ओबीसी व बनिया समाजाची मते भाजप आणि काँग्रेसमध्ये विभागल्याचे दिसून आले.
दतिया पोटनिवडणुकीचे प्रमुख मुद्दे
दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवरील लाठीचार्ज, डबल इंजिन सरकारची विकासकामे, कायदा-सुव्यवस्था, शेतकरी व खतांचे संकट, निवडणुकीतील पारदर्शकता, डॉ. नरोत्तम मिश्रा यांना तिकीट न मिळणे, भ्रष्टाचार, डिफेन्स पार्क आणि रोजगार हे प्रमुख निवडणूक मुद्दे ठरले.
– रुद्र रिसर्च अँड अॅनालिटिक्स (rudraresearch.in)
(टीप : रुद्र रिसर्च अँड अॅनालिटिक्स, पुणे ही राजकीय विश्लेषण, निवडणूक कलांचा अभ्यास तसेच प्री-पोल आणि पोस्ट-पोल सर्वेक्षण करणारी संस्था आहे. रुद्र रिसर्च अँड अॅनालिटिक्सने बांकीपूर आणि दतिया विधानसभा मतदारसंघात मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून हा एक्झिट पोल तयार केला आहे.)