bankipur bypoll result prashant kishor defeats bjp sanjay raut reaction
पुढारी ऑनलाईन : तीन विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बांकीपूरसह आलेल्या निकालांनी जनतेचा संदेश स्पष्ट केला असून, लोक राम मंदिराचा मुद्दा आणि जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे नाराज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी तीन विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीत बोलताना त्यांनी हा जनादेश भाजपच्या विरोधात असल्याचे म्हटले. राम मंदिरात झालेली लूट आणि जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला जनतेला आवडलेला नाही, असे राऊत यांनी सांगितले. तसेच जनतेने ‘मंगल मिलन’ नाकारल्याचा दावाही त्यांनी केला.
उपनिवडणुकीत भाजपला अनेक ठिकाणी धक्का बसला असताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. यामध्ये बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची सर्वाधिक चर्चा होत आहे. येथे जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी निवडणुकीच्या राजकारणातील सुरुवात विजयाने केली. त्यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा सुमारे 19 हजार 324 मतांनी पराभव केला.
बांकीपूरमध्ये भाजपचा दारुण पराभव!
बांकीपूर विधानसभा मतदारसंघात प्रशांत किशोर यांना 64,151 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांना 44,827 मते मिळाली. राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) रेखा कुमारी 14,273 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
हा विजय जनसुराज पक्षाचा पहिला विधानसभा विजय असून, प्रशांत किशोर यांच्यासाठीही ही मोठी वैयक्तिक कामगिरी मानली जात आहे.
बांकीपूर हा मतदारसंघ दीर्घकाळापासून भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. सुमारे 30 ते 35 वर्षे या जागेवर भाजपचा प्रभाव राहिला आहे. नितीन नवीन राज्यसभेवर गेल्यानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीत भाजपने आपला पारंपरिक गड कायम राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, मतदारांनी बदलाचा संदेश दिला.
पोटनिवडणुकीत कुठे, कोणाचा विजय?
कमी मतदानाची टक्केवारी असतानाही प्रशांत किशोर यांच्या विजयामुळे बिहारच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विजयानंतर प्रशांत किशोर यांनी बांकीपूरला एका रात्रीत बंगळुरू बनवणार नसल्याचे सांगितले; मात्र विकासाची कामे नक्की सुरू करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
तीन विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल संमिश्र राहिले. मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला, तर गुजरातमधील मांजलपूर मतदारसंघात भाजपला यश मिळाले. असे असतानाही विरोधी पक्ष, विशेषतः बांकीपूरच्या निकालाकडे भाजपविरोधातील जनतेच्या नाराजीचे संकेत म्हणून पाहत आहेत.