auraiya duty outweighs conventions seventh daughter performs last rites on mother
पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील औरैया येथे आईच्या निधनानंतर सातही बहिणींनी मिळून तिच्या पार्थिवाला खांदा दिला. एवढेच नाही तर सातव्या मुलीने आईच्या पार्थिवाला मुखाग्नीही दिली. परंपरेनुसार मुलींनी अंत्यसंस्कार करू नयेत, असे मानले जाते. मात्र, या सात बहिणींनी या रूढीला छेद देत समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला.
उत्तर प्रदेशातील औरैया येथून एक अशी घटना समोर आली आहे, जिने समाजाला विचार करण्यास भाग पाडले आहे. मुलींविषयी असलेल्या रूढीवादी विचारांना मागे सारत सात बहिणींनी आपल्या आईला दिलेल्या अंतिम निरोपावेळी एक असे उदाहरण घालून दिले, जे दीर्घकाळ लक्षात राहील.
आईच्या निधनानंतर सर्वांत लहान मुलीने पुढे येत आईला मुखाग्नी देण्याचा निर्णय घेतला. मोठ्या बहिणींनीही तिच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला. या भावुक प्रसंगातून असा संदेश देण्यात आला की, आई-वडिलांप्रती असलेले मुलांचे कर्तव्य हे मुलगा किंवा मुलगी यावर ठरत नाही.
वडिलांच्या निधनावेळी पुतण्याने दिला होती मुखाग्नी
मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबातील वडिलांचे अनेक वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यावेळी सामाजिक परंपरांमुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पुतण्याची मदत घेण्यात आली होती. यानंतर आईने एकट्याने संघर्ष करत आपल्या सातही मुलींचे पालनपोषण केले. मुलींसाठी त्यांची आईच त्यांचा आधार, मार्गदर्शक आणि संपूर्ण कुटुंब होती.
काळ पुढे सरकत असताना आईचेही निधन झाले. आईच्या मृत्यूमुळे सातही बहिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना मुखाग्नी कोण देणार, हा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी नेहमीप्रमाणे पुरुष नातेवाईकांकडे पाहण्याची परंपरा समोर आली.
मात्र, याच वेळी सर्वांत लहान मुलीने ठामपणे सांगितले की, आईने आम्हाला कधीही मुलाची कमतरता जाणवू दिली नाही, मग तिच्या अंतिम निरोपाच्या वेळी दुसऱ्या कोणाची मदत का घ्यायची?
सातही बहिणींनी मिळून आईच्या पार्थिवाला दिला खांदा
यानंतर सातही बहिणींनी एकत्र येत आपल्या आईच्या पार्थिवाला खांदा दिला. स्मशानभूमीत सर्वांत लहान मुलीने विधी-विधानानुसार आईच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. हा भावुक प्रसंग पाहून तेथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सातही बहिणींच्या या निर्णयातून मुलीदेखील आई-वडिलांप्रती आपली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
आईला अंतिम निरोप देताना या मुलींनी केवळ आपले कर्तव्य पार पाडले नाही, तर समाजालाही एक महत्त्वाचा संदेश दिला. संतानाचे प्रेम, आदर आणि जबाबदारी ही कोणत्याही चौकटीत बांधलेली नसते. या सातही बहिणींच्या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या या कृतीला लोकांकडून मोठी दाद मिळत आहे.