ईशान्य भारतातील राज्‍यांमध्‍ये सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. (Image source- X)
राष्ट्रीय

Northeast Rain | ईशान्‍य भारताला पावसाचा तडाखा, पुरासह भूस्खलन बळींची संख्‍या २६ वर

मिझोराममध्ये १३ घरांची पडझड, सिक्कीममध्ये १५०० पर्यटक अडकले

पुढारी वृत्तसेवा

Northeast Rain : ईशान्य भारतातील राज्‍यांमध्‍ये सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि पूरात २६ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आज (दि.१जून) प्रशासनाने दिली. मिझोराममध्ये भूस्खलन, १३ घरे कोसळली; सिक्कीममध्ये १५०० पर्यटक अडकले असून, पूरबाधित राज्‍यांमध्‍ये युद्‍धपातळीवर मदतकार्य सुरु आहे.

ईशान्य भारतातील पाच राज्‍यांमध्‍ये मुसळधार पाऊस

ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन राज्‍यांत मागील दोन दिवसांमध्‍ये २६ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममध्ये भूस्खलन आणि पुरामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अरुणाचल प्रदेशच्या पूर्व कामेंग जिल्ह्यातील बाना-सेप्पा रोडवरील राष्ट्रीय महामार्ग १३ वर भूस्खलनामुळे एक कार खोल खड्ड्यात पडली. या दुर्घटनेत दोन कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत २ जणांना आपला जीव गमवावा लागला. मिझोरामच्या सेरछिपमध्ये १३ घरे कोसळली. एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पुढील काही दिवसांत या परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर सिक्कीममध्ये सुमारे १५०० पर्यटक अडकले आहेत.

आसाम, अरुणाचल प्रदेशमध्‍ये जनजीवन विस्‍कळीत

आसाममध्ये, एकूण १७ जिल्हे पूर आणि भूस्खलनाने बाधित झाले आहेत आणि ७८,००० हून अधिक लोक बाधित झाले आहेत. १,२०० हून अधिक जणांनी पाच वेगवेगळ्या मदत शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे. लखीमपूर जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे आणि ४१,६०० हून अधिक नागरिकांना फटका बसला असल्‍याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. पूरग्रस्त आसाममध्ये एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.अरुणाचल प्रदेशातही मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग नुकसानीचे मूल्यांकन करत आहे आणि बाधित कुटुंबांना त्वरित मदत पुरवत आहे.आसामची राजधानी गुवाहाटीत पुरामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. गोलाघाटमध्ये दोन आणि लखीमपूरमध्ये एकाचा समावेश आहे. अरुणाचल प्रदेशमध्‍ये पुराच्या पाण्याने एक वाहन वाहून गेल्याने सात जणांचा मृत्यू झाला. एका वेगळ्या घटनेत दोन जण बुडाले. राज्यातील मृतांची संख्या नऊ झाली आहे. गेल्या २४ तासांत मिझोरम, त्रिपुरा आणि मेघालयात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

पूरक्षेत्रातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याचे आवाहन

मणिपूरमध्ये मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्याची राजधानी इंफाळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहराच्या अनेक भागात पाणी साचल्याची नोंद झाली आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी पूर इशारा जारी केला आहे आणि इंफाळ नदीच्या पूरक्षेत्रातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याचे आवाहन केले आहे.

उत्तर सिक्कीमच्या विविध भागात १,५०० पर्यटक अडकले

संततधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे मुख्य रस्ता बंद झाल्याने उत्तर सिक्कीमच्या विविध भागात सुमारे १,५०० पर्यटक अडकले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला मंगन जिल्ह्यात ११ पर्यटकांसह एक वाहन तीस्ता नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला, दोन जखमी झाले आणि आठ जण बेपत्ता झाले आहेत.

हिमाचल प्रदेशात ऑरेंज अलर्ट

हिमाचल प्रदेशात आज आणि उद्या वादळ आणि वादळासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. १ जून रोजी चंबा, कांगडा, कुल्लू, मंडी आणि शिमला जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या ठिकाणी इशारा देण्यात आला आहे. २ जून रोजी सोलन आणि सिरमौरसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (IMD) येत्या काही दिवसांत या प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी आसामच्या काही भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत. उर्वरित ईशान्य भारतातील राज्‍यांसाठी प्रदेशासाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT