अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी आज 'एआयएमआयएम' प्रमुख असदुद्दीन ओवैसीं यांनी खासदारकीची शपथ घेतली. शपथ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जय पॅलेस्टाईनचा नारा दिला.
शपथविधीनंतर त्यांनी प्रथम जयभीम, त्यानंतर जय मीम, जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईन अशा घोषणा दिल्या. ओवेसी यांनी पाचव्यांदा लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. यावेळी ते म्हणाले की, भारतातील उपेक्षित लोकांचे प्रश्न मी प्रामाणिकपणे मांडत राहीन.
शपथविधीनंतर माध्यमांशी बोलताना ओवैसी म्हणाले की, कोण काय बोलले आणि काय नाही, सर्व काही तुमच्या समोर आहे . मी फक्त जय भीम, जय मीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईन… असं म्हटलं आहे. हे विरोधात कसे आहे, मी बोललो ते घटनेच्या विरोधात आहे तर घटनेतील तरतुदी दाखवा, असे आव्हानही त्यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांना दिले.
लोकसभेत ओवेसी यांनी केलेल्या घोषणाबाजीला भाजप नेते जी किशन रेड्डी यांनी तीव्र विरोध केला. ते रेकॉर्डमधून काढून टाकण्याची मागणीही त्यांनी केली. यावर ओवेसी म्हणाले की, ते (जी किशन रेड्डी) विरोध करतात, हे त्यांचे काम आहे. आम्हाला जे म्हणायचे होते ते आम्ही बोललो. त्यांना खूश करण्यासाठी आपण काहीही का बोलू? असा सवाली त्यांनी केला.
भाजप नेते जी किशन रेड्डी म्हणाले की, देशाच्या संसदेत शपथ घेताना जय पॅलेस्टाईन असा नारा देणे पूर्णपणे चुकीचा आहे. एकीकडे ते (ओवेसी) भारतीय राज्यघटनेबद्दल बोलतात आणि दुसरीकडे भारतीय राज्यघटनेच्या विरोधात घोषणा देतात. भारतात राहून पॅलेस्टाईनच्या समर्थनात भूमिका घेणे पूर्णपणे चुकीचे आहे. अशा घटनांमुळे या लोकांचा खरा चेहरा समोर येतो. हे लोक रोज प्रत्येक विषयावर असे प्रकार करतात. लोकसभेत अशा घोषणा देणाऱ्यांची ओळख पटवावी, अशी मी जनतेला विनंती करतो, असेही आवाहनही त्यांनी केले.