नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात न्यायालयाचा निर्णय म्हणजे भाजपला सणसणीत चपराक आहे, अशी टीका दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केली.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आम्हाला संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. दिल्लीत जंतर-मंतरवरील सभेत ते बोलत होते. दिल्लीतील राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाने सीबीआयच्या प्रकरणात केजरीवाल यांच्यासह २३ जणांना निर्दोष मुक्त केले. त्यानंतर पहिल्यांदाच जाहीरपणे बोलताना केजरीवाल म्हणाले की, माझ्यावर १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले. चार वर्षे आमचा राजकीय छळ करण्यात आला मात्र न्यायालयाने प्रकरण फेटाळून लावले. सत्याचा विजय झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, आम आदमी पक्षाला नष्ट करण्याचा कट रचला गेला. मी आयुष्यात प्रतिष्ठा आणि प्रामाणिकपणा कमावला आहे. एक पैसाही भ्रष्टाचार केला नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, शनिवारी केजरीवाल यांनी दिल्लीतील कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात कुटुंबियांसह दर्शन घेतले. या वेळी पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. निकालानंतर पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले होते.