Weather Update
नवी दिल्ली: एप्रिल महिन्यात पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे. एका शक्तिशाली 'वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे ३ ते ५ एप्रिल दरम्यान उत्तर भारतासह देशातील विविध राज्यांमध्ये जोरदार पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या हवामान बदलामुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका पुन्हा एकदा जाणवणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिलमध्ये वायव्य भारताकडून येणारी ही हवामानाची प्रणाली अधिक तीव्र होत असून, त्याचा सर्वाधिक फटका गुजरात आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागांना बसण्याची शक्यता आहे. या काळात जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि दिल्ली-एनसीआरमध्ये ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. मार्च महिना हवामानातील अनपेक्षित बदलांमुळे गाजला होता. एप्रिलच्या किमान पहिल्या पंधरवड्यात तरी, तशाच प्रकारच्या हवामानाचा अनुभव येईल.
जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीचा इशारा.
पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात मेघगर्जनेसह पाऊस.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात वादळी वारे आणि विजांचा कडकडाट.
ही प्रणाली पूर्वेकडे सरकल्यानंतर ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही पावसाची हजेरी लागेल.
एप्रिलमधील हे अनपेक्षित हवामान शेतीसाठी संमिश्र ठरणार आहे. जमिनीतील ओलावा वाढल्याने काही पिकांना याचा फायदा होईल; मात्र काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे पावसामुळे आणि विशेषतः गारपिटीमुळे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
या पावसामुळे २०२६ चा उन्हाळा लांबणीवर पडला आहे. विशेष म्हणजे, यंदाचे हवामान चक्र २०२४ च्या उन्हाळ्याप्रमाणेच राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. पावसाच्या सरींनंतर तापमानात मोठी घट होईल, ज्यामुळे नागरिकांना काही काळ उकाड्यापासून दिलासा मिळेल.