Crime News
तिरुपती: लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागतून एका १९ वर्षीय तरुणाने १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या केली. ही घटना शुक्रवारी आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात खजिपेट तालुक्यातील अग्रहारम येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. वेंकटेश (वय १९) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजनेय कोट्टला गावातील रहिवासी असलेला वेंकटेश हा गेल्या काही दिवसांपासून मृत अल्पवयीन मुलीचा छळ करत होता. तो तिच्यावर लग्नासाठी सतत दबाव टाकायचा. मात्र, 'मी केवळ माझ्या आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलाशीच लग्न करेन', असे मुलीने त्याला सांगितले होते. असे असतानाही त्याने तिचा पाठलाग करणे आणि त्रास देणे थांबवले नव्हते.
शुक्रवारी सकाळी मुलीचे आई-वडील बाहेर गेले होते, तेव्हा मुलगी घरात एकटीच असल्याने वेंकटेशने तिच्या घरी गेला. त्यावेळी पुन्हा लग्नाच्या विषयावरून तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी संतापलेल्या वेंकटेशने सोबत आणलेल्या चाकूने तिचा गळा चिरला. मुलीने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावून आले, तोपर्यंत आरोपीने तिथून पळ काढला होता. गंभीर जखमी झालेल्या मुलीला रूग्णालयात नेत असतानाच अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला.
खजिपेट पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, वेंकटेशला काही तासांतच ताब्यात घेतले. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आणि विविध महिला संघटनांनी खजिपेट येथे निदर्शने करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.