कोलकाता; वृत्तसंस्था/पीटीआय : आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत येईल. त्यानंतर येथील भ्रष्टाचार्यांना एका मागोमाग तुरुंगात डांबल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी दिला.
सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर शहा यांनी यावेळी जोरदार हल्ला चढवला. सिलीगुढी, बॅरकपूरसह काही ठिकाणी शहा यांनी भाजपच्या संघटनात्मक बैठका घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. ‘देशात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारइतके भ्रष्ट दुसरे कोणतेही प्रशासन नाही. राज्यात भाजपचे सरकार पूर्ण बहुमताने स्थापन होईल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सिलीगुडी येथे बोलताना, त्यांनी राज्य सरकारवर सीमा सुरक्षा उपायांमध्ये अडथळे आणल्याचा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर कुंपण घालण्यासाठी बीएसएफला जमीन देण्यास ममतांचे सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही केला.
आगामी निवडणुकीत भाजप उत्तर बंगालमधील सर्व जागा जिंकेल, असा दावा शहा यांनी केला. जनता टीएमसीच्या सिंडिकेट राज आणि भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेसाठी राज्यातील अधिकारी सहकार्य करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.