पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरुन हटवल्यानंतरच माझा मृत्यू होईल, असे सांगत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ( Mallikarjun Kharge ) यांनी विनाकारण आपल्या प्रकृतीच्या समस्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओढले आहे. खर्गे यांच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो. २०४७ पर्यंत विकसित भारताची निर्मिती ते पाहोत, अशा शब्दांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah) यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना प्रत्युत्तर दिले.
अमित शहा यांनी आपल्या Xपोस्टमध्ये म्हटलं आहे की, " रविवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जम्मू-काश्मीरमधील जाहीर सभेत स्वतःची तसेच त्यांच्या नेत्यांची आणि त्यांच्या पक्षाची कामगिरीअत्यंत घृणास्पद आणि लज्जास्पद असल्याचे दाखवून दिले आहे. पंतप्रधान मोदींना सत्तेवरून हटवल्यानंतरच माझा मृत्यू होईल, असे सांगत त्यांनी विनाकारण पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या वैयक्तिक आरोग्याबाबत ओढले आहे. मी खर्गे यांना आरोग्य लाभो, अशी प्रार्थना करतो. त्यांना दीर्घायुष्य, निरोगी आयुष्य लाभो २०४७ पर्यंत त्यांनी विकसित भारताची निर्मिती वास्तव पाहावे, असेही अमित शहा यांनी म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीनिमित्त रविवारी (दि.३०) आयोजित जाहीर सभेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रकृती अचानक बिघडली. यावेळी सुरक्षा कर्मचार्यांसह उपस्थित काँग्रेस नेत्यांनी त्यांना पाणी दिले. त्यांना काही वेळ भाषण थांबवावे लागले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर बोलताना खर्गे म्हणाले, आम्ही राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी लढू. मी सध्या ८३ वर्षांचा आहे. माझा इतक्या लवकर मृत्यू होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरुन हटवल्यानंतरच माझा मृत्यू होईल. जम्मू-काश्मीर राज्यात भाजप नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारला कधीच निवडणुका घ्यायच्या नव्हत्या. त्यांची इच्छा असती तर एक-दोन वर्षात निवडणुका होऊ शकल्या असत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना येथे निवडणुका घेणे भाग पडले आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी गेल्या 10 वर्षात भारतातील तरुणांना काहीही दिले नाही. दहा वर्षांत तुमच्या आयुष्यात समृद्धी आणलेले नाही, अशा व्यक्तीवर तुम्ही कसा विश्वास ठेवू शकता?, असा सवाल करत पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमध्ये येवून तरुणांच्या भविष्यासाठी खोटे अश्रू ढाळत आहेत. त्यांनी गेल्या 10 वर्षात संपूर्ण देशातील तरुणांना अंधारात ढकलले आहे, असा आरोपही खर्गे यांनी यावेळी केला होता.