चंदीगड : लोकसभा निवडणुकीत थोडेफार यश काय मिळाले, विराधकांना वाटते की, त्यांनी निवडणूकच जिंकली आहे; पण विरोधकांना जितका आरडाओरड करायचा असेल तर करावा. पण २०२९ मध्येही त्यांना विरोधातच बसावे लागणार आहे. त्यावेळीही एनडीएचेच सरकार येईल आणि नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.
चंदीगडच्या मनीमाजरा येथे २४ तास पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार किरण खेर यांची उपस्थिती होती; तर काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी आणि महापौर कुलदीप कुमार यांनी मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले. यावेळी शहा यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, भाजपला एकट्याला मिळालेल्या जागांची संख्या इंडिया आघाडीच्या एकूण जागांपेक्षा अधिक आहे. तरीही लोकसभा निवडणुकीत थोडेफार यश मिळाले म्हणून विरोधकांना वाटत आहे की, त्यांनी निवडणूकच जिंकली आहे.
या विरोधकांना जितका आरडाओरड करायचा असेल तर त्यांनी जरूर करावा. पण मी छातीठोकपणे सांगतो की, २०२९ मध्येही विरोधकांना विरोधी बाकांवरच बसावे लागणार आहे. २०२९ ला पुन्हा एनडीएचेच सरकार येईल आणि नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील यात शंकाच नाही. अमित शहा म्हणाले, सर्जिकल स्ट्राईक करून शत्रूला मुहतोड जवाब दिला, अयोध्येत राममंदिराची उभारणी केली, ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांचा दर्जा उंचावला. हे सारे फक्त मोदी यांच्याच काळात झाले. त्यामुळेच त्यांना पुन्हा पंतप्रधान होण्याची संधी देत जनतेने जणू त्यांच्या कामावरच शिक्कामोर्तब केले. हीच जनता त्यांना २०२९ मध्येही पुन्हा पंतप्रधान निश्चित बनवेल.