Amit Shah meeting for flood management
पूर व्यवस्थापनासाठी अमित शाहांनी घेतली बैठक File photo
राष्ट्रीय

पूर व्यवस्थापनासाठी सरकारचा प्लॅन; अमित शाहांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पूर व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक दिल्लीत घेण्यात आली. या उच्चस्तरीय बैठकीला अमित शाह यांच्यासह विविध मंत्री आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देशात उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि इतर काही राज्यांमध्ये पावसाळ्यात भूस्खलन आणि इतर पावसाशी संबंधित समस्या येतात. सध्या आसाममध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक घेण्यात आली.

या बैठकीला केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, गृह विभागाचे सचिव, जलस्रोत, नदी विकास आणि नदी पुनरुज्जीवन; पृथ्वी विज्ञान; पर्यावरण, वने आणि हवामान बदल, रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे अधिकारी, रेल्वे बोर्डाचे पदाधिकारी, सदस्य, एनडीआरएफ आणि भारतीय हवामान विभागाचे महासंचालक आणि संबंधित इतर मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि इतर काही राज्यांमध्ये भूस्खलन आणि पावसाशी संबंधित इतर समस्या येतात. सध्या आसामला पुराचा सामना करावा लागत असून अनेक जिल्ह्यांमध्ये लाखो लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. गेल्या महिन्यात रेमाल चक्रीवादळामुळे त्रिपुरामध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

आसाममध्ये पुराने ३ जिल्ह्यांसह पीक क्षेत्र प्रभावित

आसामच्या नागाव जिल्ह्यात पुरामुळे सुमारे सहा हजाराहून अधिक लोक गंभीरपणे प्रभावित झाले आहेत. कांपूर आणि राहामधील ३५ गावे पाण्याखाली गेली आहेत आणि १ हजार हेक्टरपेक्षा जास्त भागातील पीक देखील पाण्याखाली गेले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार १९ जिल्ह्यांतील सुमारे ३ लाख लोकांना पूराचा फटका बसला आहे. एकट्या करीमगंज जिल्ह्यात जवळपास अडीच लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. राज्यातील १९ जिल्ह्यांतील ४८ महसूल मंडळांतर्गत ९७९ गावे पुरामुळे प्रभावित झाली आहेत. पुराच्या पाण्यामुळे पूरग्रस्त जिल्ह्यांमधील ३३२६ हेक्टरहून अधिक पीक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. रेमल चक्रीवादळामुळे आसाममध्येही जोरदार पाऊस झाला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. रेमल चक्रीवादळानंतर आलेल्या पुरात २९ हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

SCROLL FOR NEXT