शिरढोण : अलमट्टी धरणातून (Almatti Dam) आज सकाळी सहा वाजता २ लाख ४५ हजार क्युसेस इतका विसर्ग सुरू आहे. सध्या पंचगंगा पाणी पातळी स्थिर आहे. मात्र धरण क्षेत्रात काल रात्री पासून पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरीचा विसर्ग सुरु झाल्यास २०२१ ची परिस्थिती उद्भऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आलमट्टीची (Almatti Dam) पाणी पातळी ५१३ मीटर केली तरच महापुराचे नियंत्रण होणार आहे. अन्यथा कोल्हापूरकरांना गंभीर पूर परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण ९८.२० टक्के भरले आहे. धरण ३४७.५० फूट पाणी पातळी झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने भरते. सध्या धारणाची पाणी पातळी ३४६.७२ फूट झाली असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अर्धा फूट पाणी कमी आहे. पावसाचा जोर कायम असून कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचालित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे.