Kharge has criticized Prime Minister Narendra Modi.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. Pudhari File Photo
राष्ट्रीय

पंतप्रधान मोदी जनादेश नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत : मल्लिकार्जुन खर्गे

करण शिंदे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसदेतील राष्ट्रपतींचे अभिभाषण ऐकून असे वाटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जनादेश नाकारण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी (दि.27) केला. याबरोबरच त्यांनी नीट परिक्षेतील पेपरफुटी, मणिपूर हिंसाचार, महागाई, रेल्वे दुर्घटना आणि भाजपशासित राज्यांमध्ये दलित आदिवासीं लोकांवर वाढलेले अत्याचार यासारख्या मुद्यांवरुनही खर्गे यांनी सरकारवर टीका केली आहे.

संसद अधिवेशनातील राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या अभिभाषणानंतर काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील जनतेने त्यांचा “400 पार” हा नारा नाकारुन भाजपला 272च्या आकड्यापासून दूर ठेवले. परंतु, पंतप्रधान मोदी हे मान्य करायला तयार नाहीत, ते असे वागत आहेत जणू काही बदललेच नाही. असे म्हणत खर्गे यांनी पंतप्रधान जनादेश स्वीकारत नसल्याचा आरोप केला.

राज्यसभेतील भाषणात सविस्तर बोलणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. याबरोबरच नीट परिक्षेतील पेपरफुटीच्या मुद्यावर फक्त बोलून चालणार नाही, तर त्यावर ठोस उपाय केले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच देशातील प्रमुख पाच समस्येच्या मुद्यावर राष्ट्रपतींनी अभिभाषणामध्ये उल्लेख केला नसल्याचेही ते म्हणाले. वाढत चाललेली महागाई, मणिपूरमधील हिंसाचार, रेल्वे अपघात आणि प्रवाशांची दुर्दशा, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले, भाजपशासित राज्यांमध्ये दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांवर वाढते अत्याचार, यावर त्यांनी बोलले पाहिजे होते असे खर्गे म्हणाले आहेत.

SCROLL FOR NEXT