नवी दिल्ली : २८ जानेवारी रोजी बारामती येथे लियरजेट ४५ (व्हीटी- एसएसके) या खासगी विमानाचा अपघात झाला होता. त्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार या विमानातून प्रवास करत होते. संबंधित विमान व्हीएसआर व्हेंचर्स प्रायवेट लिमिटेड या नॉन-शेड्युल्ड ऑपरेटर कंपनीकडून चालवले जात होते. बारामतीतील घटनेनंतर विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) व्हीएसआर कंपनीच्या कामकाजाचे विशेष सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या ४ विमानांचे उड्डाण सध्या थांबवले आहे.
विशेष सुरक्षा लेखापरीक्षणात व्हीएसआर कंपनीची विविध पातळ्यांवर विविध पथकांनी तपासणी केली. यामध्ये सदर कंपनीद्वारे सेवा दिल्या जाणाऱ्या विमानाची उड्डाणयोग्यता, हवाई सुरक्षा आणि फ्लाइट ऑपरेशन्स या क्षेत्रांमध्ये मंजूर प्रक्रियांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. तसेच देखभाल प्रक्रियेतही गंभीर त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. या पार्श्वभूमीवर सतत विमान उड्डाण योग्यतेची मानके पूर्ण होईपर्यंत व्हीएसआर कंपनीची लियरजेट ४०/४५ प्रकारातील ४ विमाने तात्काळ ग्राउंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये व्हीटी - व्हीआरए, व्हीटी - व्हीआरएस, व्हीटी - व्हीआरव्ही आणि व्हीटी - टीआरआय यांचा समावेश आहे.
दरम्यान, विशेष सुरक्षा लेखापरीक्षणात आढळलेल्या त्रुटींविषयी मूळ कारणांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश व्हीएसआर कंपनीला देण्यात आले आहेत. कंपनी जो अहवाल सादर करेल त्याआधारे पुढील मूल्यांकन करून आवश्यक ती कारवाई डीजीसीएकडून केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
व्हीएसआर कंपनी नियमांचे उल्लंघन करते. अत्यंत मनमानी पद्धतीने असुरक्षितपणे विमाने उडवत असल्याचा मुद्दा आम्ही वारंवार मांडत आहोत आणि आज डीजीसीएने नियमांच्या उल्लंघन केल्याच्या मुद्द्यावर या कंपनीची ४ विमाने ग्राउंड केली आहेत. आमच्या लढ्याला यश येत असले तरी हे केवळ नखाएवढे आहे, अजून बरेच काही समोर यायचे बाकी आहे. मंगळवारी सकाळी या विषयावर सविस्तर बोलेल.- आमदार रोहित पवार