Ajit Doval secret mission Sikkim : "मला खात्री होती की ही आता माझ्या कारकिर्दीची अखेर आहे. मला वाटले की, आता मला नवीन कारकीर्द सुरू करावी लागेल. मी त्या घटनेकडे अत्यंत 'अनप्रोफेशनल' (व्यावसायिकतेचा अभाव असलेली) घटना म्हणून पाहिले," अशा शब्दांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी चीन सीमेजवळील एका अत्यंत धाडसी मोहिमेचे स्मरण केले. ते आयआयटी रुरकीच्या दीक्षांत समारंभात बोलत होते.
डोवाल म्हणाले की, "मी विशीत होतो. सिक्कीममध्ये गुप्तचर विभागाचा प्रभारी म्हणून माझी नियुक्ती झाली थी. सीमावर्ती भागांवर लक्ष ठेवणे आणि चीनच्या 'पीपल्स लिबरेशन आर्मी'च्या (PLA) हालचाली व कारवायांची माहिती गोळा करण्याचे असे माझ्या कामाचे स्वरूप होते. तो काळ असा होता की सिक्कीम तेव्हा भारताचा भाग नव्हता, पण तो भारताचा भाग बनण्याच्या प्रक्रियेतून जात होता. या विलीनीकरणाच्या प्रक्रियेचा मी एक भाग होतो."
१९७५ मध्ये सिक्कीम अधिकृतपणे भारताचा भाग बनले, ही विलीनीकरणाची प्रक्रिया आजही अनेक गुपितांनी वेढलेली आहे. या विलीनीकरणामागे 'रॉ' (RAW) ची एक अत्यंत गोपनीय मोहीम होती. ही मोहीम दोन वर्षांहून अधिक काळ चालली. या विलीनीकरणाच्या काळातच डोवाल यांना या हिमालयीन राज्यात पाठवण्यात आले होते. डोवाल यांनी सांगितले की, एका मोहिमेदरम्यान त्यांनी माहिती गोळा करण्यासाठी एका टीमला सीमेजवळ पाठवले होते. त्यांना आठ दिवसांच्या आत परतणे अपेक्षित होते. मात्र, १५ दिवस उलटूनही त्या टीमकडून कोणताही निरोप आला नाही.
"माझ्यासाठी ही अत्यंत चिंतेची बाब होती; केवळ व्यावसायिकदृष्ट्याच नाही तर एक माणूस म्हणूनही. ते जिवंत आहेत की मृत, आणि त्यांच्यासोबत नक्की काय घडले आहे, याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. त्यावेळी हिमस्खलन किंवा इतर कोणतीही नैसर्गिक दुर्घटना घडल्याचेही वृत्त नव्हते. काही काळानंतर, मुख्यालयातून आपल्याला फोन आल्याचे डोवाल यांनी आठवून सांगितले. "माझ्या वरिष्ठांनी विचारले, 'तुम्ही काही लोकांना पलीकडे पाठवले आहे का?' त्यावर मी म्हणालो, 'मला माहित नाही. ते येत असतीलच,'" असे डोवाल म्हणाले. त्यांची सर्वात मोठी भीती तेव्हा खरी ठरली जेव्हा त्यांना कळले की त्यांच्या टीमला चिनी सैन्याने पकडले आहे. त्यांची चौकशीही करण्यात आली होती.
काही दिवसांनंतर त्या भारतीय गुप्तचरांची सुटका करण्यात आली. डोवाल यांच्या मते, कदाचित "काहीतरी तडजोड झाली असावी". "ते पूर्णपणे खचलेल्या आणि अत्यंत दयनीय अवस्थेत परतले होते."
अवघ्या विशीत असलेल्या डोवाल यांच्यासाठी ही घटना अत्यंत धक्कादायक आणि तणावपूर्ण होती. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि डोवाल यांना वाटले की त्यांची कारकीर्द आता संपली आहे. "मला खात्री होती की ही माझ्या कारकिर्दीची अखेर आहे. मला वाटले की आता मला नवीन कारकीर्द सुरू करावी लागेल. मी त्या घटनेकडे अत्यंत 'अनप्रोफेशनल' (व्यावसायिकतेचा अभाव असलेली) घटना म्हणून पाहिले होते." चौकशीनंतर डोवाल यांना निर्दोष मुक्त करण्यात आले (क्लीन चिट मिळाली). चौकशी समितीला असे आढळले की, मुख्यालयाकडून त्यांच्या टीमला देण्यात आलेल्या नकाशे आणि रेखाचित्रांमध्येच त्रुटी होत्या. "माझी काहीही चूक नव्हती. कदाचित, मी सर्व काही योग्यच केले होते," असे डोवाल म्हणाले.
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका तिबेटी शेरपाने दिलेला एक अनपेक्षित सल्ला त्यांना या परिस्थितीतून सावरण्यास मदत करून गेला. "हे सर्व नकाशे वाचण्याचे (मॅप-रीडिंगचे) कसब आहे. काही लोक नकाशे अचूक वाचतात; तर काही जण त्यात चूक करतात," असे त्या शेरपाने म्हणल्याचे डोवाल यांनी सांगितले. त्या शेरपाचे नाव त्यांनी उघड केले नाही, पण डोवाल यांनी सांगितले की, त्या शेरपाने बर्फाच्छादित पर्वतांवरून मार्ग शोधण्यात अनेक वर्षे घालवली होती. त्या शेरपाने त्यांना तीन मार्गदर्शक तत्त्वे सांगितली, ज्यांचे वर्णन डोवाल यांनी अशा प्रकारे केले: "पहिले, तुम्ही कुठे आहात हे जाणून घ्या. दुसरे, तुम्हाला कुठे जायचे आहे हे जाणून घ्या. आणि तिसरे, तिथे जाण्याचा मार्ग कोणता आहे हे जाणून घ्या." हा सल्ला केवळ कामापुरता मर्यादित न राहता, जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन बनला, असेही डोवाल यांनी यावेळी नमूद केले.