पुढारी ऑनलाईन डेस्क : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी (दि.१५) रात्री चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेतील मृतांची संख्या १८ झाली आहे. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. प्रयागराजला महाकुंभला जाण्यासाठी हजारो भाविकांनी रेल्वे स्टेशनवर एकच गर्दी केली. यावेळी ही दुर्घटना झाली. आज (दि.१६) या दुर्घटनेवेळी रेल्वे स्थानकावर असणार्या भारतीय हवाई दलाच्या अधिकार्याने नेमकं काय घडल या विषयी माहिती दिली.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना हवाई दलाचे अधिकारी अजित म्हणाले की, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर हवाई दलाचे त्रिकोणी सेवा कार्यालय आहे. रात्री दहा वाजता माझी ड्युटी संपली. मी घरी जाण्यासाठी निघालो. त्यावेळी स्थानकावर मोठी गर्दी दिसली. गर्दी करु नका. मोठ्या संख्येने प्लॅटफॉर्मवर जमू नये, असे आवाहन यावेळी करण्यात येत होते. अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन कठोर परिश्रम करत होते; परंतु कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हतं. चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाल्याचे दिसले. मी माझ्या एका मित्रासह काही जखमींना मदत केली."
दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, दिल्ली रेल्वे स्थानकावर गर्दी मर्यादेपलीकडे होती, लोक (फूट ओव्हर) ब्रिजवर जमले होते. इतकी मोठी गर्दी अपेक्षित नव्हती. मी रेल्वे स्टेशनवर, सणांच्या वेळीही इतकी मोठी गर्दी कधीच पाहिली नव्हती. प्रशासनातील लोक आणि अगदी एनडीआरएफचे कर्मचारीही तिथे होते, पण जेव्हा गर्दीने मर्यादा ओलांडली तेव्हा त्यांना नियंत्रित करणे शक्य नव्हते."
प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, . प्लॅटफॉर्म क्रमांक १२ वर येणारी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर येणार असल्याची घोषणा करण्यात आली. ट्रेन प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी गर्दी झाली, ज्यामुळे चेंगराचेंगरी सुरु झाली. यावेळी गर्दीला नियंत्रित करणारे कोणीही नव्हते आणि चेंगराचेंगरी झाली. काही लोकांना रुग्णालयात नेण्यात आले."
दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रवाशांना विशेष ट्रेनने पाठवण्यात आले आहे... रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतूक आता सामान्य आहे," असे रेल्वे बोर्डाचे माहिती आणि प्रसिद्धी (ईडी/आयपी) कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी म्हटलं आहे.