Ahmedabad plane crash  x
राष्ट्रीय

Ahmedabad plane crash | विमान अपघातानंतर किती आणि कोण देते आर्थिक नुकसानभरपाई? विमा नसेल तर काय? जाणून घ्या...

Ahmedabad plane crash | विमान कंपनीची जबाबदारी, प्रवास विम्यातील लाभ काय असतात ?

Akshay Nirmale

Ahmedabad plane crash

अहमदाबाद : अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया फ्लाईटचा आज (गुरूवारी 12 जून 2025) दुपारी उड्डाणानंतर काही क्षणांतच अपघात झाला. या विमानात एकूण 242 प्रवासी आणि कर्मचारी होते. मेघाणीनगर परिसरात हा अपघात झाला आहे.

या अपघातानंतर एअर इंडियाने अपघातग्रस्तांच्या कुटूंबांना सर्वतोपरी सहकार्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. तत्काळ मदतीसाठी एअर इंडियाने आपत्कालीन केंद्र व सहाय्यक संघ स्थापन केला आहे.

दरम्यान, या भीषण घटनेनंतर प्रवासी सुरक्षा, विमा संरक्षण आणि अपघातानंतरची आर्थिक भरपाई हे विषय पुन्हा चर्चेत आले आहेत. या सर्व मुद्यांबाबत तपशीलवार जाणून घेऊया...

विमान कंपनीची जबाबदारी: कायदेशीर भरपाई किती?

भारतात विमान अपघातानंतरची भरपाई Montreal Convention 1999 नुसार ठरवली जाते. भारत हा या आंतरराष्ट्रीय कराराचा भाग आहे. यानुसार: प्रवासी मृत्यू किंवा शारीरिक इजा झाल्यास विमान कंपनी 128,821 SDRs (Special Drawing Rights) म्हणजेच अंदाजे 1.55 कोटी रूपयांपर्यंत भरपाई देणे बंधनकारक आहे, दोष कोणाचाही असला तरीही.

यापेक्षा जास्त भरपाई देखील मिळू शकते, परंतु त्यासाठी विमान कंपनीचा निष्काळजीपणा सिद्ध करावा लागतो.

जरी आंतरराष्ट्रीय कराराची सक्ती त्यांच्यावर नसली तरी भारतीय अंतर्गत विमान कंपन्याही सामान्यतः याच पद्धतीचे पालन करतात.

मूल्यांकन करताना विचारात घेतले जाणारे घटक-

  • प्रवाशाचे वय, व्यवसाय, शिक्षण, उत्पन्न

  • कौटुंबिक जबाबदाऱ्या व आर्थिक अवलंबित्व

  • वैवाहिक स्थिती व आर्थिक दर्जा

प्रवास विमा: अपघातानंतरचे आर्थिक कवच

प्रवासासाठी घेतला गेलेला विमा म्हणजेच Travel Insurance, या परिस्थितीत आर्थिक आधार ठरतो. अशा विमा योजनांमधून पुढील गोष्टींसाठी संरक्षण मिळते-

  • अपघाती मृत्यू व अपंगत्व

  • वैद्यकीय आपत्कालीन खर्च

  • हॉस्पिटलायझेशन

  • विमान उशीर किंवा रद्द झाल्यास नुकसान भरपाई

  • बॅगेज हरवणे

प्रमुख विमा योजनांचे लाभ

  • 25 लाख ते 1 कोटी रूपयांपर्यंत अपघाती मृत्यू विमा

  • 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत अपंगत्व भरपाई

  • हॉस्पिटलमध्ये राहिल्यास प्रतिदिन ठराविक रक्कम

विमा योजनेचा लाभ फक्त त्याच प्रवाशांना मिळतो, ज्यांनी प्रवासापूर्वी विमा घेतलेला असतो. बहुतांश भारतीय प्रवासी विशेषतः देशांतर्गत प्रवासात विमा घेणे टाळतात.

विमा नसेल तर काय?

जर प्रवाशाने स्वतंत्र प्रवास विमा घेतलेला नसेल, तरी काही पर्याय उपलब्ध असतात-

  • विमान कंपनीकडून मिळणारी भरपाई (कायद्यानुसार)

  • काही वेळा सरकारकडून दिला जाणारा एक्स-ग्रेसिया (ex-gratia) निधी

  • व्यवसायिक प्रवाशांसाठी कंपनीकडून विमा संरक्षण

  • काही प्रीमियम क्रेडिट कार्डद्वारे मिळणारे इन्शुरन्स लाभ

  • टूर कंपनी किंवा नोकरीच्या ठिकाणाहून मिळणारा ग्रुप इन्शुरन्स

भरपाई लगेच मिळते का?

खूप वेळा पीडित कुटुंबियांना भरपाई मिळवण्यासाठी महिन्यांपासून वर्षांपर्यंत वाट पाहावी लागते, विशेषतः-

  • जेव्हा अपघाताचा तपास सुरू असतो

  • जबाबदारीवर वाद असतो

  • प्रवाशाने विमा घेतलेला नसतो किंवा नॉमिनी माहिती उपलब्ध नसते

अशा वेळी कुटुंबीयांना ग्राहक न्यायालय, सिव्हिल कोर्ट, किंवा विमा लोकपाल यांच्याकडे धाव घ्यावी लागते.

प्रवास विमा महत्वाचा...

अहमदाबादमधील विमान दुघर्टना हे एक भयावह उदाहरण आहे. हवाई प्रवास पूर्णतः जोखीममुक्त नसतो. अशा संकटात विमा हा एकमेव आर्थिक आधार ठरतो. त्यामुळे प्रवाशांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात-

  • देशांतर्गत प्रवासासाठीही प्रवास विमा घ्या

  • नॉमिनीची माहिती अचूक द्या

  • अपघाती मृत्यू आणि वैद्यकीय कव्हर असलेली योजना निवडा

  • विमा दस्तऐवजाची डिजिटल व प्रिंटेड प्रत ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT