आदित्य ठाकरे यांची शरद पवारांवर टीका file photo
राष्ट्रीय

"मी पवारांवर बोलणे योग्य नाही, मात्र महाराष्ट्र तोडणाऱ्यांचे आम्ही कौतुक करत नाही" : आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांचा थेट शरद पवारांवर निशाणा

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : मी पवारांवर बोलणे योग्य नाही मात्र कुटुंब फोडणाऱ्यांचे, महाराष्ट्र तोडणाऱ्यांचे सत्कार आणि कौतुक आम्ही करत नाही, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला. तसेच ऑपरेशन टायगर करा, लोटस करा मात्र जनतेच्या प्रश्नांवर लक्ष द्या. पक्ष सोडून जाणारे 'जय महाराष्ट्र' नव्हे तर 'जय गुजरात' करतात, असे म्हणत ठाकरे यांनी भाजपसह पक्ष सोडून जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर खोचक टीका केली. दरम्यान, दिल्ली दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली. तसेच दलबदलू लोकांनी आम्हाला शिकवू नये, असे म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.

राज्यात अनेक लोकांना हे निकाल विश्वासार्ह वाटत

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. बुधवारी रात्री आदित्य ठाकरे दिल्लीत दाखल झाले. बुधवारी रात्री त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. गुरुवारी अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली. दरम्यान, गुरुवारी आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, खासदार प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या. आदित्य ठाकरे म्हणाले की, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची सौजन्य भेट होती. दिल्ली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर निकाल आपल्या सर्वांच्या समोर आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली. जे जिंकले त्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका मोठी आहे. देशात आणि राज्यात अनेक लोकांना हे निकाल विश्वासार्ह वाटत नाही. मात्र यानिमित्ताने ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठी आणि एकूण प्रक्रियेवर अनेक प्रश्न निर्माण होतात, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजपने जनतेच्या प्रश्नांवर लक्ष द्यावे

ऑपरेशन टायगरवर बोलताना ठाकरे म्हणाले की, भाजपला जे करायचे असेल त्यांनी ते करावे मात्र जनतेच्या प्रश्नांवर लक्ष द्यावे. राज्यात सुरुवातीला कोण मुख्यमंत्री होणार यावरून कुजबूज सुरू होती, पुढे कोण पालकमंत्री, कोण मालकमंत्री, कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला यावरून वाद सुरू होता. त्यामुळे सरकार स्वतःच्या गोष्टींमध्ये गुंतले असून जनतेच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. सरकार लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये करणार होते. लाडक्या भावांना अर्थसहाय्य देणार होते. याबद्दल अजून पर्यंत निर्णय घेतला नाही. शिवभोजन आणि अन्य चांगल्या योजना बंद होत आहेत. राज्य सरकारला कारखानदार लोकांना ७९ कोटींची सूट देण्यासाठी पैसे आहेत. मात्र शालेय मध्यान्न भोजनात अंडी द्यायला पैसे नाहीत, असे म्हणत राज्य सरकारवरही त्यांनी टीका केली. इंडिया आघाडीच्या भविष्यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, आघाडीच्या पुढील रणनीतीबाबत वरिष्ठ नेते चर्चा करतील. आमची लढाई ही देशासाठी आहे. महाराष्ट्रद्वेष्ट्या लोकांना आमचा विरोध आहे. जे सत्तेत आहेत त्यांच्यासोबत काँग्रेसचा नव्हे तर निवडणूक आयोगाचा हात सोबत आहे, अशीही टीका आदित्य ठाकरेंनी भाजपवर केली.

'दलबदलू लोकांनी आम्हाला शिकवू नये'

ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या सत्कारावरून संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. ययावर बोलताना 'दलबदलू लोकांनी आम्हाला शिकवू नये. जे एका पक्षाकडून सगळे काही मिळवून आता दुसऱ्या पक्षात गेले त्यांनी आम्हाला काय करावे, काय बोलावे हे शिकवू नये,' असे म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT