Aditya-L1
आदित्य-एल १ ने सूर्य- पृथ्वी L1 लॅग्रॅन्गियन बिंदूभोवती त्याची पहिली परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.  ISRO
राष्ट्रीय

Aditya ची 'एल १'भोवतीची पहिली परिक्रमा पूर्ण

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारताची अंतराळातील पहिली सौर वेधशाळा आदित्य-एल १ ने (Aditya-L1) सूर्य- पृथ्वी L1 लॅग्रॅन्गियन बिंदूभोवती त्याची पहिली परिक्रमा (orbit) यशस्वीरित्या पूर्ण आहे. याबाबतची माहिती इस्रोने X ‍वर पोस्ट करत दिली आहे. आदित्य-एल १ ला २ सप्टेंबर २०२३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. त्याला ६ जानेवारी २०२४ रोजी एल १ बिंदूभोवतीच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आले. आता त्याने L1 लॅग्रॅन्गियन बिंदूभोवतीची हॅलो कक्षेतील पहिली परिक्रमा पूर्ण करुन त्याचा वेग कायम ठेवण्याची क्षमता सिद्ध केली आहे.

''सूर्याचा अभ्यास करण्यासाठी डिझाइन केलेल्या आदित्य-L1 मिशनला L1 बिंदूभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी अंदाजे १७८ दिवस लागतात. दरम्यान, या अंतराळ यानाला विविध अडचणींचा सामना करावा लागतो; ज्यामुळे ते त्याच्या इच्छित मार्गापासून विचलित होऊन भरकटू शकते. या अडचणींचा सामना करण्यासाठी आम्ही मिशनच्या सुरुवातीपासून तीन महत्त्वपूर्ण स्टेशन-कीपिंग सुधारणा केल्या आहेत,” असे इस्रोने म्हटले आहे.

यानाच्या कक्षेत तीन सुधारणा

या यानाच्या कक्षेत पहिल्या दोन सुधारणा अनुक्रमे २२ फेब्रुवारी आणि ७ जून २०२४ रोजी करण्यात आल्या. २ जुलै रोजी तिसरी सुधारणा करण्यात आली; ज्यामुळे अंतराळयानाचे L1 भोवती त्याच्या दुसऱ्या प्रभामंडळ कक्षेतील संक्रमण सुनिश्चित झाले.

"या मोहिमेचे यश गुंतागुतीच्या गतिशीलतेच्या अचूक मॉडेलिंगवर अवलंबून आहे. हे घटक प्रक्षेपण ठरवण्यासाठी आणि अगदी अचूकतेने कक्षेत सुधारणेचे नियोजन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत,” असे इस्रोने म्हटले आहे.

यान हॅलो कक्षेतच रहावे लागते, कारण...

एल-१ भोवतीची जी हॅलो कक्षा आहे त्या कक्षेत अनेक प्रकारची शक्ती यानावर प्रभावी टाकत असतात. यामुळे यान नियोजित मार्गावरून विचलीत होऊन भरकटू शकते. हे यान हॅलो कक्षेतच रहावे यासाठी ठराविक कालावधीनंतर त्याचे इंजिन सुरु करावे लागते आणि त्याच्या मार्गात सुधारणा करावी लागत असल्याची माहिती इस्रोने दिली आहे.

SCROLL FOR NEXT