पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर बिहारमधील सीतामढीहून दिल्लीकडे जाणाऱ्या डबल डेकर बसने दुधाच्या टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये दोन महिला आणि एका चिमुकल्यासह १८ जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे २० जण गंभीर जखमी झाले आहेत.
उन्नाव पोलीस ठाण्याच्या बेहता मुजावर क्षेत्रांतर्गत हा अपघात झाला. बसने (UP 95 T 4720) दुधाच्या टँकरला (UP70 CT 3999) पाठीमागून धडक दिली, यात १८ जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बेहता मुजावर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. सर्व जखमींना बाहेर काढून सीएचसी बांगरमाऊ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत.
उन्नाव दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे.