पुढारी ऑनलाईन डेस्क
रामजन्मभूमी अयोध्येच्या (Ayodhya) विकासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांची स्तुती केल्याने उत्तर प्रदेशातील एका महिलेला तिच्या पतीने तिहेरी तलाक (triple talaq) दिला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर सातजणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील (UP News) बहराइचमधील (Bahraich) एका १९ वर्षीय विवाहित महिलेचा आरोप केला आहे की तिने राज्य आणि केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचे कौतुक केल्यामुळे तिला पतीने तिहेरी तलाक दिला. तसेच पतीसह सासू आणि इतर सासरच्या लोकांनी तिचा अमानुष छळ केल्याचा दावाही तिने केला आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर तिचा पती अर्शद, दीर फरहान आणि शफाफ, जाऊ सिमरन, सासू रईसा, सासरे इस्लाम, पतीची बहीण कुलसुम आणि एका नातेवाईकाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. या संशयितांना अटक करुन त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
द टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बहराइचच्या पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी सांगितले की, बहराइचमधील मरियम शरीफ यांचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अयोध्येतील अर्शदशी लग्न केले होते. तिने आरोप केला आहे की जेव्हा तिने अयोध्येत पीएम मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या विकासकामांचे कौतुक केले तेव्हा तिचा पती चिडून संतापला.
अर्शदने पत्नीला आधी तिच्या माहेरी पाठवले आणि नंतर तिला तलाक दिला. तसेच त्याने तिच्या अंगावर गरम मसूर डाळ फेकल्याचा आरोप आहे. मरियमने तक्रारीत म्हटले आहे की, जेव्हा तिचा पती तिला अयोध्या शहरात फिरण्यासाठी घेऊन गेला; तेव्हा अयोध्येतील विकास पाहून ती प्रभावित झाली होती. ''ती म्हणाली की योगीजी आणि मोदीजींनी खूप चांगले काम केले आहे. पण पीएम मोदी आणि सीएम योगी यांची स्तुती माझ्या नवऱ्याला आणि सासरच्या मंडळींना आवडली नाही. त्यांनी मला शिवीगाळ केली आणि मारहाण केली,” असे तिने म्हटले आहे.
ही घटना जुलैच्या अखेरीस घडली. त्यानंतर अर्शदने मरियमला माहेरी पाठवले. दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांनी त्यांच्यातील वादावर तोडगा काढला आणि अर्शदने मरियमला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अयोध्येला परत आणले. मरियमने दावा केला आहे की बहराइचमध्ये सुरुवातीला ती तक्रार दाखल करू शकली नसली तरी पोलिसांसमोर या जोडप्यामध्ये तडजोड झाली.
''५ ऑगस्ट रोजी पुन्हा त्याने मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांबद्दल चुकीचे बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तीन वेळा ‘तलाक’ म्हटले. या धक्क्यादरम्यान मी जेव्हा प्रत्युत्तर दिले तेव्हा सासू आणि दीरांनी वादात तोंड घातले आणि मला मारहाण केली. तर माझ्या पतीने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पतीने माझ्यावर गरम मसूर डाळीचे भांडे फेकले,” असे पीडित महिलेने म्हटले आहे. तिने एकात्मिक तक्रार निवारण सेवा पोर्टलद्वारे ऑनलाइन तक्रार नोंदवली. तसेच या घटनेबाबत १८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही पत्र लिहिले.