नवी दिल्ली : ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी, शुक्रवारी सायंकाळी ७:३० वाजता नियोजित असलेले कवी संमेलन पुढे ढकलण्यात आले. हे कवी संमेलन शनिवारी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपामध्ये होईल, अशी जाहीर सूचना सूत्रसंचालकांनी उद्घाटन कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार, कवी इंद्रजीत भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता नियोजित होते. वेळेच्या अभावाने हे कवी संमेलन पुढे ढकलण्यात येत असल्याचे सूत्रसंचालकांनी जाहीर केले. या अगोदर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन कार्यक्रम दोन सत्रांमध्ये झाला. पहिल्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन विज्ञान भवन येथे करण्यात आले. त्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटनाचा दुसरे सत्र तालकटोरा स्टेडियम मध्ये झाले. लांबलेल्या या दोन कार्यक्रमामुळे वेळेचा अभाव पडला आणि कवी संमेलन पुढे ढकलण्याची वेळ आयोजकांवर आली.
आता हे नियोजित कवी संमेलन शनिवारी सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडपात होईल. तर डॉ . बाबासाहेब आंबेडकर सभामंडपामध्ये शनिवारी सकाळी दहा वाजता नियोजित असलेला मुलाखतीचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभा मंडपामध्ये होईल, अशी घोषणा सूत्रसंचालकांनी आयोजकांच्या वतीने केली.