Tamil Nadu Stampede | तामिळनाडूत चेंगराचेंगरी; 36 जणांचा मृत्यू Pudhari File Photo
राष्ट्रीय

Tamil Nadu Stampede | तामिळनाडूत चेंगराचेंगरी; 36 जणांचा मृत्यू

अभिनेते विजय थलापती यांच्या रॅलीत दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

चेन्नई; वृत्तसंस्था : तामिळनाडूतील तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख आणि लोकप्रिय टॉलीवूड अभिनेते विजय थलापती यांच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 36 जणांचा मृत्यू झाला तर अनेक लोक गंभीर जखमी झाले. रॅलीच्या वेळी 30 हजारांवर समर्थकांची गर्दी झाल्यामुळेच दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या अंदाजानुसार, ज्या ठिकाणी विजय नामक्कलमधील आपल्या पूर्वीच्या सभेनंतर भाषण करणार होते, तिथे किमान 30,000 लोक जमले होते. मात्र, त्यांच्या आगमनाला सहा तासांहून अधिक विलंब झाला. त्यामुळे तोपर्यंत गर्दी अनियंत्रित झाली होती. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले.

विजय यांची रॅली वादाच्या भोवर्‍यात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. या महिन्याच्या सुरुवातीला त्रिचीमधील त्यांच्या पहिल्याच रॅलीत विमानतळापासून कार्यक्रमस्थळापर्यंत त्यांच्या ताफ्यासोबत प्रचंड गर्दी जमली होती, ज्यामुळे 20 मिनिटांचा प्रवास सहा तासांच्या वाहतूक कोंडीत बदलला आणि संपूर्ण शहर ठप्प झाले होते. सुरक्षेच्या कारणास्तव, पोलिसांनी ‘टीव्हीके’च्या रॅलींसाठी 23 अटी घातल्या होत्या, ज्यात ताफ्यात सामील होण्यावर बंदी, सार्वजनिक स्वागत समारंभांवर बंदी आणि गर्भवती महिला, वृद्ध आणि दिव्यांगांना ऑनलाईन कार्यक्रम पाहण्याचा सल्ला, यांचा समावेश होता.

न्यायालयांनीही सार्वजनिक सुरक्षेवर आणि अभिनेते-राजकारणी यांच्या जबाबदारीवर कठोर निरीक्षणे नोंदवली होती, जरी ‘टीव्हीके’ने पक्षपातीपणाचा आरोप केला होता. विजय यांनी वारंवार आवाहन करूनही, त्यांच्या समर्थकांनी यापैकी बहुतेक अटी उघडपणे धुडकावून लावल्या होत्या. अनेकांनी तर लहान मुले आणि बाळांनाही सोबत आणले होते. मद्रास उच्च न्यायालयाने या महिन्याच्या सुरुवातीला ‘टीव्हीके’च्या रॅलींसाठी पोलिसांनी लादलेल्या कठोर आणि पूर्ण न करता येण्याजोग्या अटींविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना, असे निर्बंध सर्व पक्षांवर लावले जात आहेत का, असा सवाल केला होता.

पुरेशी खबरदारी घेतली होती का?

करूरची दुर्घटना ‘टीव्हीके’ची जबाबदारी आणि पोलिसांची सज्जता या दोन्हींवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. विजयच्या आगमनातील प्रचंड विलंब गर्दी वाढण्यास कारणीभूत ठरला का आणि आपले प्रचंड जनसमर्थन दाखवण्यासाठी हे हेतूपुरस्सर केले गेले होते का? पूर्वीच्या रॅलींमधून मिळालेले धोक्याचे संकेत लक्षात घेता, अशी दुर्घटना टाळण्यासाठी पुरेशी खबरदारी घेण्यात आली होती का? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT