नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संसदीय संयुक्त समिती (जेपीसी) चा अहवाल गुरुवारी (दि.१३) संसदेत सादर करण्यात आला. या अहवालात असे निदर्शनास आले आहे की, देशातील राष्ट्रीय महत्त्वाची सुमारे २८० स्मारके वक्फ बोर्डाची मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यातील बहुतेक स्मारके राजधानी दिल्लीतील आहेत.
कुतुबमिनार, फिरोजशाह कोटला, पुराण किल्ला, हुमायूनचा मकबरा, जहांआरा बेगमचा मकबरा, कुतुबमिनार परिसरातील लोखंडी स्तंभ आणि इल्तुतमिशचा मकबरा यासारख्या स्मारकांवरही वक्फचा दावा असल्याचे अहवालात निदर्शनास आले आहे. समितीच्या सुनावणीदरम्यान भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने या स्मारकांची यादी सादर केली होती.
याशिवाय नगरविकास मंत्रालयाने समितीला सांगितले की, भू-विकास विभागाच्या १०८ मालमत्ता आणि डीडीएच्या १३० मालमत्ता वक्फच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. 'वक्फ'ने नंतर या स्मारकांवर आपला दावा सांगितला. एकेकाळी वक्फ बोर्डाकडे देशात ५२ हजार नोंदणीकृत मालमत्ता होत्या. आज ९.४ लाख एकर जमिनीवर ८.७२ लाख स्थावर मालमत्ता आहेत, असे अहवालात नमूद आहे.