हैदराबाद : आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे एका भीषण बस दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू झाला. मद्यधुंद अवस्थेत बाईक चालवणे आणि बस चालकाचा बनावट परवाना ही या अपघातामागील प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी चालकाला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिस आयुक्तांनी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणार्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
1. आंंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे बसला लागलेल्या आगीत 20 जणांचा जिवंतपणी होरपळून मृत्यू झाला. ही घटना आपल्या रस्ते सुरक्षा प्रणालीतील त्रुटींचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात, हे दाखवते. या घटनेमागे दोन प्रमुख पात्रं समोर आली आहेत; एक, ज्याने बनावट शैक्षणिक प्रमाणपत्राच्या आधारे लायसन्स मिळवले तो बस चालक आणि दुसरा, ज्याने दारूच्या नशेत बाईक चालवण्याचा निर्णय घेतला तो बाईकस्वार.
2. याप्रकरणी बस चालक मिरियाला लक्ष्मैया याला अटक करण्यात आली आहे. तपासात असे समोर आले आहे की, लक्ष्मैया फक्त पाचवीपर्यंत शिकलेला असून, त्याने दहावी पास असल्याचे बनावट प्रमाणपत्र बनवून वाहन चालवण्याचा परवाना मिळवला होता. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठीच्या नियमांनुसार किमान आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे.
शुक्रवारी रात्री सुमारे 2 वाजता कुर्नूलमधील चिन्ना टेकुरूजवळ दुचाकीवरून जाणार्या दोघांचा अपघात झाला. त्यांची बाईक रस्त्यावर घसरून दुभाजकाला धडकली, ज्यात बाईक चालवणार्या शिव शंकर याचा मृत्यू झाला, तर मागे बसलेला एरी स्वामी जखमी झाला. अपघातानंतर एरीने शिव शंकरचा मृतदेह रस्त्यावरून उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला समजले की त्याचा मृत्यू झाला आहे.
तो रस्त्यावरून बाईक बाजूला करण्याच्या प्रयत्नात असतानाच, एका बसने त्या बाईकला चिरडले आणि ती बसखाली अडकून फरफटत गेली. याच दरम्यान, बाईकच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट झाला आणि आग लागली.
हैदराबादचे पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनार म्हणाले की, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणारे लोक दहशतवाद्यांपेक्षा कमी नाहीत आणि हा अपघात नसून निष्काळजीपणामुळे घडलेला गुन्हा होता.