आंध्र, तेलंगणात एनडीआरएफच्या पथकांकडून बचावकार्य सुरु आहे. (Image source- NDRF)
राष्ट्रीय

आंध्र, तेलंगणात पावसाचा कहर; १९ मृत्यू, शाळांना सुट्टी, १४० रेल्वे गाड्या रद्द

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि तेलंगणात (Telangana) मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. येथे पावसाशी संबंधित घटनांमध्ये १९ लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे १७ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. संततधार पावसामुळे दोन्ही राज्यांत पूरस्थिती गंभीर बनली आहे. यामुळे सुमारे १४० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येथे मुसळधार पाऊस सुरु असून पुरामुळे रस्ते बंद झाले आहेत. अनेक भागांशी संपर्क तुटला आहे. हजारो लोक पुरात अडकून पडले आहेत.

पीएम मोदींकडून दोन्ही राज्यांना मदतीचे आश्वासन

दरम्यान, दोन्हा राज्यांतील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu) आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी (Telangana Chief Minister Revanth Reddy) यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी दोन्ही राज्यांतील पूर परिस्थितीची माहिती घेतली. पुढील काही दिवसांत येथे आणखी पावसाची शक्यता असल्याने केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पीएम मोदी यांनी दोन्ही राज्यांना दिले आहे. आंध्र, तेलंगणामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

आंध्रमध्ये ९ आणि तेलंगणात १० मृत्यू

पीटीआयच्या वृत्तानुसार, १९ मृतांपैकी ९ आंध्र प्रदेशातील आहेत. तर तेलंगणामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्र मधील पुराच्या पाण्यात आणखी तिघेजण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर तेलंगणातील एक व्यक्ती बेपत्ता आहे.

१४० रेल्वे गाड्या रद्द

दक्षिण मध्य रेल्वे (SCR) ने १४० रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तर ९७ गाड्यांचा मार्ग बदलला आहे. यामुळे सुमारे ६ हजार प्रवासी विविध रेल्वे स्थानकांवर अडकून पडले आहेत.

Andhra Pradesh Rain : विजयवाडामध्ये पूरस्थिती गंभीर, २.७६ लाख लोक प्रभावित

राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण पथकांकडून पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू आहे. आंध्र प्रदेशातील सुमारे १७ हजार अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. विजयवाडामध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे. येथील सुमारे २.७६ लाख लोक पुरामुळे प्रभावित झाले आहे.

हैदराबाद जिल्ह्यात आज शाळांना सुट्टी

हैदराबादमध्येही रात्रभर जोरदार पाऊस सुरू राहिल्याने शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. हैदराबाद जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केल्याने आज २ सप्टेंबरला सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT