पुढारी ऑनलाईन डेस्क : Jammu and Kashmir | जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील गेल्या ४० दिवसांत १५ जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये बहुतांश लहान मुलांचा समावेश आहे. मृत्यूला कारणीभूत असलेल्या आजाराचे गूढ अद्याप अस्पष्ट आहे. सरकारच्या आदेशानुसार, या मृत्यूची चौकशी करण्यासाठी चौकशीसाठी SIT (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील 'मृत्यू'चे गूढ अजूनही उलगडलेले नाही. या घटनेत ४० दिवसांत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. उमर अब्दुल्ला यांच्या सरकारने अज्ञात आजारामुळे झालेल्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, "ते राजौरी जिल्ह्यातील बुधल गावातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत".
दरम्यान, जम्मूमधील रुग्णालयात दाखल असलेल्या एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. "सरकार बुधल गावातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, जिथे एका अज्ञात आजाराने १५ लोकांचा बळी घेतला आहे," असे सरकारी प्रवक्त्याने सांगितले.
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGIMER), चंदीगड, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV)-इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) यांच्या तज्ज्ञ पथकांनी गेल्या एका महिन्यात नमुने गोळा केले आहेत आणि या मृत्यूंना कारणीभूत ठरू शकणाऱ्या कोणत्याही आजाराचा प्रसार झाल्याचे कोणत्याही अहवालात आढळलेले नाही, असे म्हटले आहे.