नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दररोज रात्री भारतीय रेल्वेतून सुमारे ८ लाख प्रवासी वातानुकूलित (एसी) रेल्वेने पुरवलेल्या लिनन बेडरोलचा वापर करतात. यामध्ये सहसा दोन चादरी, एक ब्लँकेट, उशी, उशीचे कव्हर आणि छोटा टॉवेल समाविष्ट असतो. ही सेवा तिकिटासोबतच दिली जाते. मात्र, प्रवासाची सांगता होताच काही प्रवासी (दर हजारामागे अंदाजे १) बेडरोलमधील किमान एकतरी वस्तू सोबत घेऊन निघून जातात, असा खुलासा एका इंग्रजी दैनिकाच्या तपासणीतून झाला आहे.
या वृत्तपत्राने रेल्वेच्या सर्व ६९ विभागांत माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज दाखल केले होते. १८ पैकी १६ रेल्वे झोनमध्ये येणाऱ्या ५४ विभागांकडून उत्तरे मिळाली, यातील काहींनी अर्धवट माहिती दिली. या नोंदींनुसार, जानेवारी २०२२ (साथ रोगानंतर बेडरोल सेवा पूर्ववत झाल्यावर) ते मे २०२६ दरम्यान किमान १.२७ कोटी बेडरोलच्या वस्तू चोरीला गेल्या.
ही चोरी प्रामुख्याने प्रवाशांनीच केली. वर्षनिहाय आकडेवारी पाहता, २०२२ ते २०२५ दरम्यान अशा चोऱ्यांमध्ये ५६ टक्के वाढ झाली, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या चार वर्षांहून जास्त काळातील चोरीमुळे बेडरोल कंत्राटदारांचे अंदाजे १०४.५१ कोटी रुपयांचे नुकसान झाले. महत्त्वाचे म्हणजे, कंत्राटदार कामावर ठेवलेल्या कोच अटेंडंटस्च्या पगारातून ही रक्कम वसूल करतात, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सात झोनमधील १० विभाग लिनन बेडरोल चोरीतील तब्बल ६७ टक्के भागासाठी जबाबदार आहेत. यात मुंबई, बिकानेर, जोधपूर, जयपूर, रांची, दिल्ली, अहमदाबाद, सोनपूर व दानापूर (बिहार) व बिलासपूर यांचा समावेश आहे.
सर्वाधिक चोरी होणाऱ्या वस्तू
बिकानेर : चादरी
दिल्ली : टॉवेल
सोनपूर : उश्यांचे कव्हर
जोधपूर : ब्लँकेट
चोरीचा ‘ट्रेंड’
चोरीच्या वस्तूंमध्ये चेहरा पुसण्याचा लहान टॉवेल (सोबत नेणे सर्वात सोपे) अव्वल आहे. चार वर्षांत ४६.५४ लाख टॉवेल्स चोरीला गेले. त्यानंतर चादरी (४१.१३ लाख), उश्यांचे कव्हर (२३.५९ लाख), ब्लँकेट (१२.९५ लाख) व उश्या (२.७६ लाख) यांचा क्रमांक लागतो.