पुढारी ऑनलाईन डेस्क : Chhattisgarh Naxalites Encounter | छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात रविवारी (दि.९) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले. चकमकीदरम्यान चार जवान गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परिसरात अजुनही शोध मोहीम सुरू आहे.
रविवारी सकाळी बिजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवरील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक पथक नक्षलविरोधी कारवाईवर असताना चकमक सुरू झाली. या चकमकीत ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. आयजी बस्तर पी सुंदरराज यांनी सांगितले की, चकमकीदरम्यान चार सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोन सैनिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दोन जखमी सैनिकांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
यावर्षी १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत राज्यात वेगवेगळ्या चकमकीत ५० हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. छत्तीसगड पोलिसांच्या माहितीनुसार, राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यापासून सुरक्षा दलांनी आतापर्यंत विविध चकमकींमध्ये २१९ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले आणि विष्णू देव साई मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून, राज्यातील नक्षलविरोधी कारवाईला वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत राज्य नक्षलमुक्त करण्याची घोषणा केली आहे.
बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार. शोध मोहीम सुरू आहे.पी सुंदरराज, आयजी बस्तर
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी सैनिकांच्या बलिदानाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर लिहिले आहे की, 'बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत दोन सैनिक शहीद आणि दोन जखमी झाल्याची दुःखद बातमी देखील मिळाली आहे. सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. मार्च २०२६ पर्यंत राज्य नक्षलवादापासून मुक्त होईल.'