पुढारी ऑनलाईन डेस्क: रशियाने युक्रेनवर फेब्रुवारी २०२२ मध्ये ड्रोन ह्ल्ला केला. यावेळीपासून रशिया-युक्रेन युद्ध धुमसत आहे. दरम्यान भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांबाबत महत्त्वाची माहिती आज (दि.१७) उघड केली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात किमान १२ भारतीय ठार झाले आहेत तर १६ जण बेपत्ता आहेत. मृत भारतीय रशियाच्या बाजूने लढत होते, असे मंत्रालयाने पुढे म्हटले आहे.
भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "आजपर्यंत, १२६ प्रकरणे (रशियन सैन्यात सेवा देणाऱ्या भारतीय नागरिकांची) आहेत. या १२६ प्रकरणांपैकी ९६ लोक भारतात परतले आहेत आणि त्यांना रशियन सशस्त्र दलातून सोडण्यात आले आहे. रशियन सैन्यात १८ भारतीय नागरिक अजूनही सेवा देत आहेत आणि त्यापैकी १६ जणांचा ठावठिकाणा माहित नाही."
जयस्वाल पुढे म्हणाले, "रशियाच्या बाजूने त्यांना बेपत्ता म्हणून वर्गीकृत केले आहे. आम्ही लवकरात लवकर सुटका करून उर्वरित लोकांना मायदेशी परत पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत. रशियन सैन्यात सेवा बजावणाऱ्या १२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे." रशियाच्या युक्रेनशी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान रशियन सैन्यात भरती झालेल्या एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आणि दुसरा जखमी झाला त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली आहे.
युक्रेन संघर्षादरम्यान केरळमधील बिनिल बाबू यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांचे पार्थिव मायदेशी परत आणण्यासाठी भारतीय दूतावास रशियन अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. आणखी एक भारतीय नागरिक जैन टीके मॉस्कोमध्ये उपचार घेत आहे आणि उपचार पूर्ण झाल्यानंतर ते भारतात परतण्याची अपेक्षा आहे. बिनिल बाबू यांच्या मृत्यूबद्दल प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले आहे की, "बिनिल बाबू यांचे निधन अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती आमच्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांचे पार्थिव शक्य तितक्या लवकर भारतात परत यावे यासाठी आमचे दूतावास रशियन अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीवर मॉस्कोमध्ये उपचार सुरू आहेत... आशा आहे की, उपचार पूर्ण झाल्यानंतर तोही लवकरच भारतात परत येईल."