नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली-एनसीआरमध्ये बुधवारी रात्री उशीरापर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे ११ जणांचा मृत्यू झाला. दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये विजेचा धक्का लागून ३ जणांचा मृत्यू तर या पावसाने दिल्लीत ८ जणांचा बळी घेतला. याशिवाय दिल्ली आणि राजधानी परिसरातील अनेक भागात पावसामुळे पाणी साचले होते. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागले. दिल्ली सरकारने गुरुवारी सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Delhi Heavy rain)
मुसळधार पावसाने दिल्लीच्या रस्त्यांना नदीचे स्वरुप आले. आयटीओ ते लक्ष्मीनगरपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. कॅनॉट प्लेस आणि मंडी हाऊसमध्ये पाणी साचल्याने रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मिंटो पुलाखाली पाणी होते. (Delhi Heavy rain)
देशाच्या राजधानी दिल्लीत ५ ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे दिल्लीकरांना येत्या काही दिवसांमध्ये त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.