देवळा : विठेवाडीत शासनाच्या नविन वाळू लिलाव धोरणाला एकमुखाने विरोध दर्शवतांना उपस्थित ग्रामस्थ.(छाया -सोमनाथ जगताप) 
Latest

नाशिक : गिरणा नदीकाठावरील गावांचा वाळू उपशाला विरोध कायम ; बैठकीत एकमुखी निर्णय

अंजली राऊत

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार वाळू उपाशाला विरोध करण्यासाठी तालुक्यातील विठेवाडी, भऊर, सावकी, खामखेडा व लोहोणेर या गांवातील ग्रामस्थांची भूमिका जाणून घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी आज बुधवार (दि. १०) रोजी विठेवाडी येथिल दत्त मंदिराच्या प्रांगणात बैठक आयोजित केली होती.

बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे उपस्थित होत्या. त्यांनी शासनाने सर्वसामान्य जनतेला स्वस्तात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी जेथे जेथे वाळूचे स्तोत्र उपलब्ध होतील. त्याठिकाणी वाळू ठिय्याची निविदा काढून ती वाळू एका ठिकाणी जमा करून सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची भूमिका मांडली. त्यानंतर या पद्धतीने वाळू उपसा करण्यास वरील सर्व गावकऱ्यांनी ग्रामसभेचा ठराव संमत करून एकमुखीने विरोध दर्शविला. भऊर, विठेवाडी, सावकी, खामखेडा, लोहोणेर या पाच गावातील ग्रामस्थांनी वाळू उपशा विरोधात ठराव संमत करून शासनाच्या नवीन वाळू धोरणाचा निषेध नोंदवला. यावेळी विठेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी दिनकर जाधव, शशिकांत निकम, पंडित निकम, भऊर येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल पवार, बाजार समितीचे माजी संचालक जगदीश पवार, लोहोणेरचे सरपंच सतिष देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, खामखेड्याचे माजी सरपंच पंढरीनाथ शेवाळे, गणेश शेवाळे, सावकीचे सरपंच कारभारी पवार, माणीक निकम, विनोद आहेर, आदींनी नविन वाळू धोरणाचा निषेध करत ठाम विरोध दर्शविला.

देवळा : ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे. समवेत उपविभागीय अधिकारी चंदशेखर देशमुख, तहसीलदार विजय सूर्यवंशी, सरपंच सतीश देशमुख, समन्वयक कुबेर जाधव आदी. (छाया -सोमनाथ जगताप)

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी सांगितले की, आम्ही तुमचा विरोध समजु शकतो. नदीकिनाऱ्यावरील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे. तसेच शेतकऱ्यांच्या जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले तरच ते जगतील. सरकारच्या वाळू उपशाला विरोध दर्शवित आहात आणि दुसरीकडे रात्री बेरात्री उशिरापर्यंत अवैध वाळू उपसा सुरू असतो अशी माहिती समोर आली आहे. त्याला तुम्ही का पायबंद घालत नाही? तुम्ही स्थानिक अधिकाऱ्यांना का पाठीशी घालता? असा सवाल उपस्थित केला असता लोहोणेर येथील सरपंच सतिश देशमुख यांनी आम्ही अवैध वाळू उपसा संदर्भात अनेक वेळा शासकिय अधिकाऱ्यांना संपर्क साधून मुद्देमाल पकडून देण्याचे सांगितले. परंतु ठराविक कालावधीनंतर ते सोडून दिली जातात. बैठकीत पाचही गावांतील ग्रामस्थांनी शासनाच्या नवीन वाळू धोरणाचा निषेध  नोंदवत सर्वानुमते ठराव संमत करून शासनाकडे सुपूर्द केला. यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीला तहसिलदार विजय सुर्यवंशी आदींसह भउर येथील सरपंच दादा मोरे, काशिनाथ पवार, पांडुरंग पवार, मिलिंद पवार, बाजार समिती संचालक अभिमन पवार, भाऊसाहेब पवार, सुभाष पवार, विठेवाडी येथील सरपंच भाऊसाहेब पवार, विठोबा सोनवणे, भास्कर निकम, पंडित निकम, राजेंद्र निकम, विलास निकम, महेंद्र आहेर, संजय सावळे, अभिजित निकम, धना निकम, रावसाहेब निकम, काकाजी निकम, खामखेडा सरपंच वैभव पवार, रविंद्र शेवाळे, संजय सावळे, प्रविण निकम, ललित निकम, श्रावण बोरसे, दीपक निकम, बाळासाहेब सोनवणे, नंदकिशोर निकम, दादाजी सोनवणे, लक्ष्मण निकम, अमर जाधव, रवींद्र कापडणीस, अशोक आहेर, वसंत निकम, बाळासाहेब निकम, भैय्या निकम, काशिनाथ बोरसे, जिभाऊ बोरसे, सावकीचे दिलीप पाटील, शेखर बोरसे, धनंजय बोरसे आदीसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी प्रास्ताविक केले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल पवार यांनी आभार मानले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT