मुंबई, वृत्तसंस्था : महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पुढच्या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवार यांनी आजच्या अर्थसंकल्पातून क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची कामगिरी उंचावण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या.(Mission Lakshyavedh)
खेळाडूंसाठी 'मिशन लक्षवेध' योजनेंतर्गत राज्य स्तरावर उच्च कामगिरी केंद्र, विभागीय स्तरावर क्रीडा उत्कृष्टता केंद्र, जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशी खेळाडूंसाठी त्रिस्तरीय प्रशिक्षण यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
यासोबत आशियाई स्पर्धेत ज्या खेळाडूंना सुवर्णपदक मिळाली आहेत, त्यांना सरकार 1 कोटी देणार आहे, तर रजतपदक जिंकणार्या खेळाडूंना 75 लाख आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना 50 लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा यावेळी महाराष्ट्र विधिमंडळात मंगळवारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. (Mission Lakshyavedh)
यासोबत अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी यांना विकासाची संधी देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
पॅरा आशियाई पदक विजेत्यांसाठीही प्रस्ताव
राज्यातील आशियाई पदक विजेत्यांना यापूर्वी शासनाकडून पारितोषिक दिले जात होते. सुवर्णपदक विजेत्याला 30 लाख रुपये, रौप्यपदक विजेत्याला 20 लाख, तर कांस्यपदक विजेत्याला 15 लाख रुपये दिले जायचे. मात्र, त्यामध्ये वाढ करून अनुक्रमे 1 कोटी, 75 लाख आणि 50 लाख रुपये असे अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेले आहे. याचा प्रस्ताव क्रीडा विभागाकडूनच शासनाला सादर करण्यात आलेला होता. याच धर्तीवर पॅरा आशियाई पदक विजेत्यांनाही रक्कम मिळावी, असा प्रस्ताव दाखल केला असल्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.