पुढारी ऑनलाईन डेस्क
मल्ल्याळम चित्रपट दिग्दर्शक अली अकबर यांनी मुस्लीम धर्माचा त्याग करत असल्याची घोषणा केलीय. उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डचे माजी अध्यक्ष वासीम रिझवी यांच्या पाठोपाठ अली अकबर देखील धर्म सोडणार असल्याने एकच चर्चा होताना दिसतेय. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुस्लीम समाजातील काही व्यक्तींनी स्माईली इमोजी पोस्ट केल्या होत्या. या कृत्यामुळं अली आणि त्यांची पत्नी ल्युसायमा यांनी मुस्लीम धर्माचा त्याग करुन हिंदू धर्माचा स्वीकार करणार असल्याचं म्हटलंय.
एका वेबसाईटनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर अली अकबर यांचं नवं नाव राम सिंग असणार आहे.
सीडीएस रावत यांचे निधन झाल्यानंतर ज्या काही स्माईली इमोजी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्या. त्याचा निषेध म्हणून मुस्लीम धर्मातील वरिष्ठ नेत्यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. भारतीय संरक्षण दलाच्या संदर्भातील अशा प्रतिक्रिया स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत, असं अकबर यांनी म्हटले आहे. अली यांनी फेसबूकवर व्हिडिओ पोस्ट करुन ही घोषणा केलीय.
'आज मी मला जन्मापासून मिळालेली ओळख फेकून देत आहे. आजपासून मी मुस्लीम नसून मी भारतीय आहे. भारताविरोधात स्माईली पोस्ट करणाऱ्या हजारो लोकांविरोधातील ही माझी प्रतिक्रिया असल्याचं अली अकबर म्हणाले आहेत. अली अकबर यांनी देखील कमेंटसला प्रत्युत्तर देताना काही आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. त्यानंतर ती पोस्ट फेसबुकवरुन हटवली गेली. मात्र ती व्हॉट्स अॅपवरुन शेअर करण्यात आली आहे.'
सोशल मीडियावर सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनानंतर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या. त्यांच्यावर कारवाई व्हावी. शिक्षा करावी, अशी मागणी करणारी त्यांनी पोस्ट लिहिलीय. पण, या पोस्टनंतर सोशल मीडियावर दोन गट पडले. काही जणांनी अली यांचे समर्थन केलंय. काही जणांनी त्यांच्या विरोधात कमेंट्स केल्या आहेत.
पत्नीसह स्वत: अली यांनी हिंदू धर्म स्वीकारणार असल्याचं म्हटलं. पण, दोन्ही मुलींना धर्मांतर करण्यासाठी सक्ती करणार नसल्याचे त्यांनी म्हटलंय. अली हे भाजपच्या राज्य कार्यकारिणीत होते. मात्र, पक्ष नेतृत्वासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला होता.