पढारी ऑनलाईन डेस्क : पावसाळा सुरू झाला की, हवामान विभागाकडून 'या प्रदेशात ऑरेंज अलर्ट', 'आज या भागात रेड अलर्ट आहे'… 'प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचा इशारा सांगितला आहे'. ही वाक्य तुमच्या कानावर पडली असेलच. पण तुम्हाला हवामानाच्या ( Alert) पावसासंदर्भात 'रेड' अलर्ट, 'ऑरेंज' अलर्ट, 'यलो' अलर्ट, 'ग्रीन' अलर्ट या संकल्पनांचा अर्थ माहित आहे का? चला तर मग पावसाच्या या संकल्पना समजून घेऊया.Rain Alert
देशाच्या बहुतांश भागात मान्सून पाऊस जोरात सुरु आहे. काही राज्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD-India Meteorological Department) राज्यात काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी यलो अलर्ट सांगितला आहे. अलर्ट सांगितला आहे पण नेमका कमी, अधिक, रिमझिम, जोरदार, मुसळधार, अतिमुसळधार, की ढगफूटी नेमका कसा, हे कसं कळणार. यासाठी पावसाच्या स्थितीनुसार भारतीय हवामान विभाग लोकांना सतर्क करत असते. जेणेकरून नागरिक सतर्क राहतील आणि संभाव्य धोके कमी होतील. जीवीत आणि वित्त हानी होणार नाही.
रेड अलर्टचा साधा सरळ अर्थ म्हणजे धोका. हवामानाच्या दृष्टीने अतिधोकादायक परिस्थिती ओढावण्याची शक्यता असते तेव्हा हवामान विभाग रेड अलर्ट देत असतो. ढगफुटी, अतिवृष्टी, पूर, अतिजोरदार पाऊस, भुस्खलन आदी मोठ्या नैसर्गिक संकटाची शक्यता असल्यास त्या भागाला रेड अलर्ट दिला जातो. रेड अलर्ट दिल्यानंतर नागरिकांनी शक्यतो घरीच बसावे. या अलर्टमध्ये नागरिकांना स्थलांतर देखील करावे लागू शकते. थोडक्यात रेड अलर्टमध्ये जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असते. रेड अलर्ट दिल्यानंतर आपात्कालीन विभाग, प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, NDRF, SDRF मदत आणि पुनर्वसन विभाग, विद्युत विभाग, फायर ब्रिगेड, समुद्रकिनारी असमारे तटरक्षक दल आदी प्रमुख विभाग सतर्क राहत असतात. या अलर्टमध्ये यंत्रणा तातडीने काम करण्याची गरज असते. कोणतीही जीवीत व वित्त हानी होऊ नये याची सर्वतोपरी काळजी या यंत्रणा घेत असतात.
मुसळधार पाऊस असेल त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून दिला जातो. ऑरेंज अलर्टमध्ये, रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते. ऑरेंज अलर्टचा अर्थ म्हणजे त्या भागात कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. अत्यंत जोरदार, अति जोरदार किंवा जोरदार पाऊस पडू शकतो. अशा वेळी नागरिकांनी आवश्यक तेव्हाचं योग्य ती काळजी घेऊन बाहेर पडावे.
यलो अलर्ट ही पावसाच्या खतऱ्याची पहिली घंटा असते. थोडक्यात सावधगिरीचा इशारा नागरिकांना देण्यासाठी ज्या भागात काही वेळाने आपत्ती येण्याची शक्यता असेल तर हवामान विभाग यलो अलर्ट (Yellow Alert) देते.
ग्नीन अलर्टमध्ये असलेली ठिकाणे ही नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित असतात. या ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात असतो. या भागासाठी निर्बंध लावले जात नाहीत.
भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड तसेच कोकण किनारपट्टीला आज (दि.१४) पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. आयएमडीच्या फोरकास्टनुसार, शनिवारी कोकण किनारपट्टीसह रायगडला रेड अलर्ट, मुंबई आणि ठाण्याला यलो अलर्ट होता. रविवारपासून (दि.१४) पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.