वर्धा : पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने वर्ध्यात होणार्या 96 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली. महामंडळाच्या बैठकीत ही निवड एकमताने करण्यात आल्याचे अध्यक्ष उषा तांबे यांनी जाहीर केले.
वर्ध्यातील अनेकांत स्वाध्याय मंदिर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली. यावेळी घटक संस्थांकडून
संमेलनाच्या अध्यक्षपदाकरिता नावे मागविण्यात आली. त्यात माजी न्या. चपळगावकर यांची एकमताने निवड झाल्याची माहिती तांबे यांनी
पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष रमेश वन्सकर, कार्यवाहक डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत ससाणे आदी उपस्थित होते. येथील स्वावलंबी विद्यालयाच्या प्रांगणात 3 ते 5 फेब्रुवारीअखेर संमेलन होणार आहे. विदर्भ साहित्य संघ ही या संमेलनाची निमंत्रक संस्था आहे.
तांबे म्हणाल्या, नरेंद्र चपळगावकर यांच्या रूपाने संमेलनाला विचारवंत लेखक अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. तर्कशुद्ध, तत्त्वनिष्ठ भूमिका ठेवून चपळगावकर यांनी वैचारिक लेखन केले आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा ते हैदराबादमुक्ती संग्राम यासंदर्भात त्यांनी महत्त्वपूर्ण लेखन केले आहे. ते त्यांच्या सम्यक द़ृष्टीचे दर्शन घडविणारे आहे. इतिहासाचा धागा वर्तमानाशी जोडताना त्यांनी जी विचारद़ृष्टी दिली आहे ती मोलाची आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला आनंद होत आहे, असे त्या म्हणाल्या.
संमेलनाचे उद्घाटन 3 फेब्रुवारी रोजी सकाळी होईल. ग्रंथ प्रदर्शनात साधारणतः 300 गाळे असतील. त्यांचे उद्घाटन 2 फेब्रुवारी रोजी पूर्व अध्यक्षांच्या हस्ते होईल. प्रकाशक, ग्रंथ विक्रेते यांच्या सोयीकरिता हा बदल करण्यात आल्याचे यावेळी सांगितले. संमेलनाची सुरुवात 3 फेब्रुवारी रोजी ग्रंथदिंडीने होईल. मुलाखत, परिसंवाद, प्रकाशन कट्टा, वाचक कट्टा, कवी संमेलने, कवी कट्टा, गझल कट्टा असे अनेक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात येणार आहे. संमेलनाचा समारोप 5 फेब्रुवारी रोजी होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.