यवतमाळ : जिल्ह्यात पुढील चार दिवस ‘येलो अलर्ट‘ जारी करण्यात आला आहे. यादरम्यान वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतशिवारातील कामे करताना नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यात मान्सून सर्वदूर सक्रिय झाला आहे. वातावरणात बदल झाला असून, तापमानातही तीन ते चार अंश सेल्सिअसने घट नोंदविण्यात आली आहे. आतापर्यंत २५ महसुली मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची पेरणीसाठी सर्वत्र लगबग सुरू आहे. पाऊसही नियमित हजेरी लावत असल्याने आजघडीस जिल्ह्यात अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. पिकांना आवश्यक असलेला पाऊस कोसळत असल्यामुळे पिकांची वाढ योग्य दिशेने सुरू आहे.
असे असतानाच, आता पुढील चार दिवस पुन्हा ‘येलो अलर्ट‘ जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शेतकऱ्यांनी शेतीची कामे शक्यतो सकाळच्या सुमारास उरकून घ्यावीत. तसेच पाऊस किंवा विजा सुरू असताना झाडांचा आडोसा न घेता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.