यवतमाळ : कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई सुरू असून, १४ जुलैपर्यंत ४ हजार ९० कृषी निविष्ठा दुकानांची तपासणी करण्यात आली. यात १५१ कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिले असून, ३८ परवाने निलंबित केले आहेत. १५ परवाने कायमस्वरूपी रद्द केले तर आठ प्रकरणांमध्ये फौजदारी कारवाई करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक घेतली.
शेतकऱ्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेत ज्या बियाणे कंपन्यांविरुद्ध उगवणीबाबत तक्रारी आहेत, त्या कंपन्यांना जबाबदार धरून सर्व तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्ह्यात आतापर्यंत सोयाबीन बियाणे उगवणीच्या एकूण ८३२ तक्रारी प्राप्त असून, नेर, बाभूळगाव आणि दारव्हा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ४१५ तक्रारी नेर तालुक्यात असून, त्यानंतर बाभूळगावमध्ये १५६ आणि दारव्हा तालुक्यात १३६ तक्रारी आहेत. कळंब ५०, वणी १९, यवतमाळ १३, पुसद ११, आर्णी ९, घाटंजी व मारेगावमध्ये प्रत्येकी ५, दिग्रस ४, पांढरकवडा ४, उमरखेड ३ तर महागावमधून २ तक्रारी आहेत.