यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात बाभुळगावलगतच्या नदीवरील पुलाजवळ मंगळवारी झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, हरेश्वर गायकवाड हा गवंडी गावावरून बाभुळगाव येथे बँकेत पैसे काढण्याकरिता येत होता. रस्त्यात बाभुळगाव बसस्थानकावरून पंकजकुमार याला हरेश्वर याने दुचाकीवर घेतले. दरम्यान एक ऑटो पाणीपुरी घेऊन बाभुळगाव बसस्थानकाकडे जात असताना नदीवरील पुलाजवळ पलटी झाला होता.
त्यातील गुपचुपचे चिंचेचे चिकट पाणी रस्त्यावर पडले होते. त्यावरून दुचाकी जात असताना ती स्लीप झाली. त्याच क्षणी समोरून (एम एच ३४ बीझेड ३५४) सिमेंट घेऊन निघालेला दहाचाकी ट्रक भरधाव वेगात आला. त्यावेळी मोटारसायकल सरळ चाकाखाली आल्याने हरेश्वर सुरेश गायकवाड (वय २७, रा. गवंडी) याचा जागीच मृत्यू झाला.
तर दुसरा पंकज कुमार (रा. ठाणा गौंड, महादेवगड, तहसील लबादा) हा बाहेर फेकल्या गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला जखमी अवस्थेत तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र काही वेळाने उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.