यवतमाळ : सर्वत्र नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे तालुक्यातील घोन्सा गावात एकाचवेळी तिघांच्या झालेल्या अपघाती मृत्यूने दुःखाचे सावट पसरले. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात घोन्सा येथील आजी-आजोबा आणि नात असे तिघेही ठार झाले. बुधवारी दुपारी या तिघांचेही पार्थिव घोन्सा येथे पोहचताच, मृतांच्या नातलगांचा आक्रोश आणि हुंदक्यांनी सारे गाव गलबलून गेले. घराच्या अंगणात धार्मिक सोपस्कार पार पडल्यानंतर गावालगतच्या स्मशानभूमीत आजी- आजोबाला एका चितेवर अग्नी देण्यात आला, तर चिमुरड्या नातीला बाजूलाच माती देण्यात आली. यावेळी अंत्यसंस्कारासाठी अलोट गर्दी उसळली होती.
घोन्सा येथील रहिवासी सतीश भाऊराव नागपुरे (वय ५१), मनिषा सतीश नागपुरे व त्यांची नात मायरा राहुल नागपुरे (वय ३) हे तिघेजण मंगळवारी (दि. ३१ डिसेंबर) सायंकाळी ४ वाजता भद्रावती येथे दुचाकीने गेले होते. तेथे सतीश नागपुरे यांचा साडभाऊ वास्तव्याला आहे. भद्रावती येथील पेट्रोलपंपाजवळ साडभावाचा धाबा आहे. ३१ डिसेंबर असल्याने सतीश नागपुरे यांना त्यांच्या साडभावाने जेवणासाठी धाब्यावर बोलाविले. त्यामुळे सतीश, त्यांची पत्नी मंजुषा व नात मायरा हे धाब्यावर रोले. तेथे जेवण आटोपल्यानंतर पुन्हा घरी जाण्यासाठी या तिघांसह साडभावाची मुलगीदेखील दुचाकीवर बसली.
चौघेही घराकडे निघाले. वाटेत एक रस्ता दुभाजक ओलांडत असताना चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सतीश नागपुरे, त्यांची पत्नी मनिषा व नात मायरा हे तिघेही जागीच ठार झाले, तर साडभावाची - मुलेगी जखमी झाली. अपघाताची वार्ता मंगळवारी रात्री घोन्सा गावात पोहचताच, मृतांच्या नातलगांसह गावकऱ्यांना धक्काच बसला. बुधवारी या तिघांचेही पार्थिव घोन्सा गावात पोहचताच, सतीश नागपुरे यांच्या घरासमोर नातेवाईक तसेच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अपघांतातील मयत सतीश नागपुरे यांना राहुल आणि साहिल अशी दोन मुले आहेत.