प्रशांत भागवत
उमरखेड ः वैशाखाच्या कडक उन्हाने संपूर्ण परिसर होरपळून निघत असतानाच निसर्ग मात्र आपल्या रंगांची उधळण करण्यात मग्न असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. शहराच्या परिसरात आणि रस्त्यांच्या कडेला उभे असलेले गुलमोहर वृक्ष आता पूर्ण बहरात आले असून, लाल-केशरी फुलांनी संपूर्ण वातावरणाला एक वेगळीच काव्यमय झळाळी प्राप्त झाली आहे. कोरड्या, रखरखत्या वातावरणात हा गुलमोहर जणू धगधगत्या अग्निज्वालेप्रमाणे भासत असून, त्याचे सौंदर्य प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.
उन्हाळा म्हटला की झाडांची पानगळ, कोरडी जमीन आणि उष्णतेची तीव्रता असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र अशा कठीण ऋतूतही गुलमोहर आपला बहर कायम ठेवत निसर्गात नव्या उत्साहाची चाहूल देतो. त्याच्या फांद्यांवर दाटून आलेली लाल, नारिंगी आणि पिवळसर छटांची फुले पाहताना जणू एखाद्या चित्रकाराने रंगांची मुक्त उधळण केली आहे, असे वाटते. काळवंडलेल्या ढगांच्या पार्श्वभूमीवर उमललेली ही फुले अधिकच उठून दिसत असून, पावसाळ्याच्या आगमनाची चाहूलही नकळत देत आहेत.
मराठी साहित्य आणि कवितांमध्ये गुलमोहराला विशेष स्थान आहे. प्रेम, आठवणी, विरह, तरुणाई आणि गावाकडच्या पायवाटा या साऱ्या भावविश्वाशी गुलमोहर जोडला गेला आहे. अनेक कवींनी त्याच्या बहरात जीवनातील उत्कट भावनांचे प्रतिबिंब पाहिले आहे. म्हणूनच कवीच्या ओळी सहज आठवतात... रानामध्ये पेटल्या जणू लाल ज्वाला, तसा फुलला गुलमोहर उन्हाच्या काळा... कवि, प्रा, डॉ, अनिल काळबांडे ना आपली आपल्या प्रेयसी शी गुलमोहराचे झाडा खाली, झालेली पहिली भेट आठवते. ते, म्हणतात, गुलमोहराच्या झाडाखाली तिची न माझी ओळख झाली. कळलेच नाही. कधी रे मजला! शत जन्माची सोबत झाली.
तर काही साहित्यिकांनी गुलमोहराला ‘उन्हात उमललेली सावली’ अशीही उपमा दिली आहे. कारण रखरखत्या वातावरणातही हा वृक्ष मनाला शांत करणारा आणि डोळ्यांना दिलासा देणारा ठरतो. शहरातील अनेक ठिकाणी सध्या गुलमोहराच्या झाडाखाली नागरिक फोटो काढताना, क्षणभर विसाव्यासाठी थांबत असल्याचे चित्र दिसत आहे.
मोबाईलच्या युगातही निसर्गाशी नाते जोडण्याचे काम हा बहरलेला गुलमोहर करत आहे. विशेषतः सकाळच्या किंवा सायंकाळच्या मंद प्रकाशात त्याचा रंग अधिक खुलून दिसत असून, अनेक निसर्गप्रेमींसाठी तो आकर्षणाचा विषय ठरत आहे.