यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा
शहरापासून जवळच असलेल्या बोरगाव धरण येथे पोहण्यासाठी गेलेले दोन विद्यार्थी पाण्यात बुडाले. ही घटना बुधवारी (दि.28) सायंकाळी समोर आली. आदित्य वाके (१७, रा. मच्छी पूल), तन्मय शर्मा (१७, रा.शनी मंदिर परिसर, यवतमाळ) अशी बोरगाव धरणात बुडालेल्या विद्यार्थ्याची नावे आहेत.
इयत्ता अकरावीत शिकणारे चार विद्यार्थी बुधवारी दुपारी बोरगाव धरण परिसरात फिरण्यासाठी गेले. आदित्य , तन्मय यांच्यासोबत सुफियान मलनस व वेदांत श्रीवास हे दोघेही होते. धरण परिसरात आदित्य आणि तन्मय यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. बराच वेळ झाला तरी दोघेही बाहेर न आल्याने धरणाबाहेर असलेले सुफियान आणि वेदांत हे विद्यार्थी घाबरून गेले. त्यांनी घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी पोलिसांना कळविले. पोलीस आणि शोध व बचाव पथकाने रात्री घटनास्थळ गाठून शोधमोहीम सुरू केली. मात्र आंधार पडल्याने व धरण परिसरात पाऊस कोसळत असल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. आज गुरुवारी सकाळपासून शोध मोहीम सुरू करण्यात आली. अखेर सकाळी दहा वाजताच्या सुमारास दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळले, अशी माहिती यवतमाळचे तहसीलदार योगेश देशमुख यांनी दिली.
पंधरा दिवसापूर्वी यवतमाळ नजिकच्या कापरा येथील धबधब्यावर पोहायला गेलेल्या श्याम सुनील जोशी या अकरावीतील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आठवडाभरापूर्वी यवतमाळ तालुक्यातील येळाबारा येथील धबधब्यावर पोहायला गेलेला घाटंजी येथील देवराज गेडाम हा तरुण बुडाला होता. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.