काँग्रेसने लोकांच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष केले, असे नितीन गडकरी म्हणाले 
यवतमाळ

लोकांच्या सर्वांगीण विकासाकडे काँग्रेसचे दुर्लक्ष : नितीन गडकरी

Maharashtra Assembly Election : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणल्याशिवाय समस्या सुटणार नाहीत

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : 'देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वाधिक सत्ता काँग्रेसने भोगली. परंतु लोकांच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष केले. 'गरिबी हटाव' चा नारा दिला परंतू गरीबी केवळ काँग्रेसच्या नेत्यांची दूर झाली. याउलट आम्ही शेतकरी, शेतमजूर यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांची विविध मार्गाने प्रगती कशी होईल, याचा विचार केल्याने आज देशात प्रगतीचे वारे वाहू लागले आहेत, असे प्रतिपादन, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी उमरखेड येथे केले. ते येथील भाजपाचे उमेदवार किसनराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

पुढे गडकरी म्हणाले, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणल्याशिवाय शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार नाहीत. शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रयोगाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार व उत्पादन कसे मिळेल, यावर भर दिला पाहिजे. नियोजनबध्द शेती केल्यास शेती हे उत्पन्नाचे सर्वोत्तम स्त्रोत म्हणून समोर येण्यास वेळ लागणार नाही. आज पेट्रोल व डिझेलवर आपल्या देशाचे २२ लाख कोटी रुपये खर्च होतात. त्याला पर्याय म्हणून आपल्या देशात इंधन निर्मिती करणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून इथेनॉल, बायोगॅस, सीएनजी हे प्रकल्प राबविणे काळाची गरज आहे. आता तुर्‍हाटी, पर्‍हाटी,गहु तांदुळ या पासून इथेनॉल निर्मिती करण्यावर भर दिल्या जात आहे. लवकरच देशात इथेनॉलचे ४०० पंप इंडियन ऑइल उभारणार आहे, अशी माहीती गडकरींनी यावेळी दिली. बायोगॅस निर्मिती सुद्धा उभारण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत लोकांना भ्रमित करण्याचे काम काँग्रेसने केले. ४०० पार झाल्यास संविधान बदलणार, असा अपप्रचार केला. परंतु काँग्रेसच्या या भूलथापांना महाराष्ट्रातील जनता यावेळी बळी पडणार नाही, असे ते म्हणाले. जातीयवादावर लक्ष न केंद्रित करता देशातील प्रत्येक नागरिकांच्या विकासावर लक्ष केंद्रित करून मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने दहा वर्षे काम केले. यापुढेही विकास हाच आमचा अजेंडा आहे, असे ते म्हणाले. यावेळी आमदार नामदेव ससाने, माजी आमदार उत्तमराव इंगळे, महादेव सुपारे, अंबादास साकळे, महिंद्र मानकर ,आरती फुफाटे, इरफान कुंदन, महेश काळेश्वरकर, श्याम भारती महाराज, चितांगराव कदम ,प्रवीण मिराशे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT