जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देताना ग्रामस्थ Pudhari
वाशिम

Washim News | शिरपुटी ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ; चौकशी न झाल्यास ग्रा. पं. कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा

शिरपुटी येथील ग्रामपंचायत कार्यालयात २०२३ पासून विविध विकासकामांच्या निधीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Shirputi Gram Sabha Dispute

वाशिम : शिरपुटी येथील ग्रामपंचायत कार्यालयात २०२३ पासून विविध विकासकामांच्या निधीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात ग्रामसभा घेण्याची मागणी वारंवार करूनही विद्यमान सरपंचांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

ग्रामसभेबाबत मागील महिनाभरात दोन ते तीन वेळा लेखी पत्र देऊनही सभा घेण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी होणारी ग्रामसभा पुढे ढकलून २ फेब्रुवारीला घेण्यात आली; मात्र त्या सभेत उपस्थित ग्रामस्थांच्या प्रश्नांना सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. सभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी १७ फेब्रुवारी रोजी पुन्हा ग्रामसभा घेण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते.

त्यानुसार १७ फेब्रुवारीलाही सभा झाली नाही. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेण्यात येईल, असे आणखी एक पत्र देण्यात आले; मात्र त्या दिवशीही ग्रामसभा पार पडली नाही, असा आरोप आहे.

गावात विकासकामांच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत ग्रामस्थांनी सरपंचांकडे प्रश्न उपस्थित केले. मात्र समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्यात आल्याबाबत विचारणा केल्यावर सरपंच वसंता नथुजी कांबळे यांनी अयोग्य भाषेचा वापर केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

या प्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ग्रामसभेस सर्व संबंधित अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

सन २०२३ ते २०२५ या कालावधीत झालेल्या सर्व विकासकामांच्या निधीची सखोल चौकशी करून गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व शासकीय निधीची वसुली करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

निलेश राठोड, ऋषिकेश वंजारे, कैलास राठोड, रवी पाटील, महादेव चव्हाण, आकाश राठोड, साईनाथ आडे, पृथ्वीराज राठोड, मांगीलाल राठोड, सुशांत चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT