Washim district electricity repair campaign
वाशिम: वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आणि येऊ घातलेल्या पावसाळ्याचा विचार करून महावितरणने अकोला परिमंडळात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामांना गती दिली आहे. तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचल्यामुळे वीज यंत्रणेवर ताण वाढत असून संभाव्य बिघाड टाळण्यासाठी ही कामे अत्यावश्यक असल्याचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी सांगितले. तसेच या कालावधीत ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपकेंद्रे आणि वीजवाहिन्यांवरील विविध कामे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहेत. या कामांसाठी सकाळी ७ ते १२ या वेळेत काही भागांमध्ये तात्पुरता वीजपुरवठा खंडित केला जात आहे. याबाबत ग्राहकांना एसएमएसद्वारे पूर्वसूचना देण्यात येत असून पर्यायी वीजपुरवठ्यालाही प्राधान्य दिले जात आहे.
महापारेषण आणि महावितरण यांच्या समन्वयातून ही मोहीम राबवली जात आहे. यामध्ये वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, इन्सुलेटर्स बदलणे, रोहित्रांची तपासणी, ऑइल फिल्टरेशन, लाईटनिंग अरेस्टर बदलणे, वीजखांब व तारा मजबूत करणे, गंजलेले खांब बदलणे तसेच उपकेंद्रांतील ब्रेकर्स व पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल अशा विविध तांत्रिक कामांचा समावेश आहे.
सध्या परिमंडळातील ३३ केव्हीचे ६९ फीडर आणि ११ केव्हीचे २८३ फीडरवरील कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित ३३ केव्हीचे १५० आणि ११ केव्हीचे ११६४ फीडरवरील कामे वेगाने सुरू आहेत. उपकेंद्रांमध्ये रिले कोऑर्डिनेशन, अर्थिंग व्यवस्था आणि ट्रान्सफॉर्मर सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक परवानगी घेऊन झाडांची छाटणी करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. अधीक्षक अभियंते प्रतिक्षा शंभरकर, सुरेंद्र कटके आणि अजय शिंदे हे कामांचा नियमित आढावा घेत असून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.