Washim Soybean Crop Insurance Claim
वाशिम: एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असताना, दुसरीकडे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू केला आहे.
जिल्ह्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही, विमा कंपन्यांनी पीक कापणी प्रयोगात (Crop Cutting Experiment) चक्क '० टक्के घट' दाखवून शेतकऱ्यांचे विमा दावे (Claims) नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अन्यायाविरुद्ध आता कारंजा लाड येथील जागरूक शेतकरू महेश प्रकाश कळाखे यांनी थेट मंत्रालयापर्यंत धडक दिली असून भ्रष्ट यंत्रणेचा पर्दाफाश करण्याचा निर्धार केला आहे.
चालू हंगामात अतिवृष्टी आणि कीड-रोगांमुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. नियमानुसार, विमा कंपन्यांनी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसानीची भरपाई देणे अपेक्षित होते. मात्र, वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी संगनमत करून पीक कापणी प्रयोगाचे अहवाल बदलल्याचा आरोप होत आहे. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष नुकसान ७०-८०% असताना कागदोपत्री 'शून्य टक्के' घट दाखवून विमा नाकारण्यात आला आहे.
कारंजा लाड तालुक्यातील तारखेडा येथील महेश कळाखे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकरणातील तांत्रिक कागदपत्रे आणि अहवालांची मागणी प्रशासनाकडे केली असून, या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. "शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या घामाचा हिशोब विमा कंपन्यांना द्यावाच लागेल. ज्या कर्मचाऱ्यांनी खोटे अहवाल सादर केले, त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई व्हावी," अशी मागणी कळाखे यांनी केली आहे.