Washim Tree Cutting Stay Order
वाशिम : वाशीम शहरातील अकोला नाका ते हिंगोली मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या १०९ सार्वजनिक वृक्षांच्या तोडीस न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते व वृक्षप्रेमी सागर कोकास यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. एस. सहस्त्रबुद्धे यांनी पुढील आदेश होईपर्यंत “जैसे थे” स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशीम पालिका हद्दीतील अकोला नाका ते हिंगोली रस्त्यावर असलेल्या वृक्षांची तोड सुरू असल्याचे १६ एप्रिल २०२६ रोजी सागर कोकास यांच्या निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर त्यांनी तातडीने न्यायालयात अर्ज व प्रतिज्ञापत्र दाखल करून संबंधित वृक्षांचे संरक्षण करण्याची मागणी केली.
अर्जात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित प्रतिवादींकडून काही वृक्षांची तोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, उर्वरित वृक्ष तोडण्याची तयारी सुरू असल्याचेही सांगण्यात आले. तसेच, वृक्षतोडीमागे लाकूड काळ्या बाजारात विक्री करण्याचा हेतू असू शकतो, अशी शंका अर्जदारांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात वादीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने प्राथमिकदृष्ट्या प्रकरण गांभीर्याने घेतले. प्रतिवादींकडून अद्याप बाजू मांडण्यात आलेली नसल्याने अंतिम निर्णयासाठी वेळ लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे तात्पुरता दिलासा म्हणून संबंधित १०९ वृक्षांची सद्यस्थिती कायम ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
यानुसार, या प्रकरणातील प्रतिवादींनी पुढील सुनावणी व आदेश होईपर्यंत कोणतेही झाड तोडू नये, तसेच परिसरातील परिस्थितीत कोणताही बदल करू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, वृक्षसंवर्धनाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.