Yogesh Kumbhejkar self enumeration
वाशिम : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची ठरणारी ‘जनगणना २०२७’ प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. या उपक्रमाच्या प्रारंभानिमित्त जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी ऑनलाईन माध्यमातून स्वतःची ‘स्व-गणना’ पूर्ण केली.
यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, जनगणनेअंतर्गत गोळा होणारी माहिती ही देशाच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने ती अचूक आणि योग्य प्रकारे भरावी. तसेच हा उपक्रम जनकल्याणाशी निगडित असल्यामुळे नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.
‘जनगणना २०२७’ अंतर्गत ‘स्व-गणना’ हा पहिला टप्पा १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान प्रगणकांकडून घरोघरी भेट देऊन प्रत्यक्ष घरगणना केली जाणार आहे. या प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी प्रगणकांना आवश्यक सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
केंद्र शासनाने यासाठी अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिले असून नागरिकांनी आपल्या कुटुंबाची माहिती काळजीपूर्वक व अचूकपणे भरावी. माहिती सादर करण्यापूर्वी ती तपासून पाहण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.