बुलढाणा:राज्यात अलिकडेच मार्च २०२६ मध्ये अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विदर्भातील बुलढाणा, अकोला व भंडारा या तीन जिल्ह्यांतील नुकसानग्रस्तांसाठी एकूण १३ कोटी २७ लाख ९८ हजार रुपयांच्या मदतीस मंजुरी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय २५ जून २०२६ रोजी निर्गमित केला आहे.अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिली.नुकसानभरपाईची रक्कम थेट लाभार्थी शेतक-यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे.
बुलढाणा,अकोला व भंडारा या तीन जिल्ह्यातील १४ हजार ७१६ बाधित शेतकऱ्यांच्या ७ हजार ९३४.७२ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी ही मदत वितरित केली जाणार आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याला सर्वाधिक निधी मंजूर झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील १२ हजार ५२ बाधित शेतकऱ्यांच्या ६ हजार ६१०.६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीपोटी १० कोटी ९९ लाख ३९ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील १ हजार ४७६ शेतकऱ्यांच्या ९७५.३१ हेक्टर क्षेत्रासाठी १ कोटी ६९ लाख २६ हजार रुपये, तर भंडारा जिल्ह्यातील १ हजार १८८ शेतकऱ्यांच्या ३४८.७८ हेक्टर क्षेत्रासाठी ५९ लाख ३३ हजार रुपये निधी मंजूर झाला असून तो तात्काळ वितरित करण्यात येणार आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या मदतीची रक्कम बँकांनी कर्जवसुलीसाठी अथवा इतर कोणत्याही कारणासाठी अडवू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना निर्देश देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीस मंजुरी दिल्यामुळे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.